भगीरथ भालकेंकडून विठ्ठल कारखान्याची लूट सुरूच!
जून महिन्यात उचलले १९ लाख :मरजीत पाटील यांनी केला खुलासा
विठ्ठल कारखाना भालके पिता पुत्रांनीच संपविला अशी टीका विरोधकांकडून होत आहे. विठ्ठलची आर्थिक घडी विस्कटण्यामागे भालके गटाची सत्ताच कारणीभूत आहे, अशा प्रकारचे वातावरण तालुक्यासह जिल्ह्यात पसरले आहे .ही परिस्थिती असताना येत्या ५ जुलै रोजी विठ्ठलचे मतदान होत आहे .याचवेळी भगीरथ भालके यांच्या वर्तनाची पुष्टी देणारा आणखी एक पुरावा अमरजीत पाटील यांनी दिला आहे. भगीरथ भालके यांनी १८ जून रोजी कारखान्याच्या विठ्ठल क्रेडिट सोसायटीमधून १९ लाख रुपयांची उचल घेतली असल्याचे उघड केले आहे. यामुळे पूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
विठ्ठलची निवडणूक सध्या रंगात आली आहे. भालके यांच्या काळात विठ्ठल कारखाना डबघााईस आल्याची टीका, भगीरथ भालके यांच्यावर होत आहे. याचवेळी २०१९-२० सालात महाराष्ट्र सहकारी बँकेकडून ११५ कोटी रुपये मिळाले होते. त्या पैशाचा हिशोबही भालके यांनी आजवर दिला नाही. निवडणूक रिंगणात या रुपयांंवरून त्यांच्यावर मोठी टीका होत आहे. असे असताना आता भगीरथ भालके यांच्या कृष्णकृत्याचा पर्दाफाश, अमरजीत पाटील यांनी केला आहे. १८ जून २०२२ रोजी विठ्ठल कारखान्याच्या, विठ्ठल क्रेडिट सोसायटीमधून भगीरथ भालके यांनी त्यांच्यासह इतर पाच जणांच्या नावे, १९ लाख रुपये उचलण्यात आले असल्याचे पुरावे अमरजीत पाटील यांनी सादर केले आहेत.
विठ्ठल कारखान्याचा सभासदवर्ग, ऊस तोडणी वाहतूकदार, यांच्यासह कर्मचाऱ्यांची लाखो रुपये देणी कारखान्याकडे थकीत आहेत. यासाठी कर्मचारी आणि सभासदांनी आंदोलनेही केली आहेत. याचवेळी विठ्ठल सोसायटीमधून १९ लाख रुपये उचल घेऊन , भालके यांनी सभासदांच्या विश्वासासच तडा घालवला असल्याचे बोलले जात आहे.