सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचा 42 वा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा आज येथे प्रचंड उत्साहात पार पडला. सभासदांच्या थकित ऊस बिलाचा प्रश्न भीमा कारखान्याचे चेअरमन खा.धनंजय महाडीक यांनी सोडविल्यामुळे सर्व सभासदांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण दिसत होते. सभासद प्रचंड संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना श्री.धनंजय महाडीक म्हणाले, “भीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रचंड ऊसाची उपलब्धता आहे व त्यामुळे गाळपासाठी सभासदांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तसेच उपपदार्थ निर्मिती शिवाय ऊसाला चांगला दर देता येणार नाही या प्रामाणिक हेतूने आपण विस्तारीकरण व सह विद्युत निर्मिती प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेतला. मात्र दरम्यान खासगी साखर कारखान्यांची संख्या वाढली.दर एका वर्षाआड पडणाऱ्या दुष्काळामुळे प्रकल्पपूर्ततेला विलंब लागला.गोडाऊन मधील प्रत्येक एका साखर पोत्यामागे प्रति वर्ष सुमारे 350 रुपये प्रमाणे दोन वर्षाचे 750 रुपये व्याज असा असा संस्थेवर मोठा व्याजांचा ताण आला. एकीकडे एफआरपी च्या कायद्यानुसार 14 दिवसाच्या आत ऊस बिल देणे हे कायदेशीर बंधन आहे तर दुसरीकडे मात्र संपूर्ण साखर विकून संपावयला दोन वर्ष लागतात.तसेच साखरेला बाजारातील मिळणारी किंमत व साखर उत्पादनासाठी येणारा खर्च यांचा कुठेही ताळमेळ बसत नव्हता. यामुळे यासह अनेक कारणांमुळे इतर अनेक कारखान्यांप्रमाणेच आपल्या कारखान्यापुढे सुद्धा अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र आता अडचणी संपल्या आहेत. भीमाच्या कार्यक्षेत्रामध्ये सोन्यासारखा ऊस उपलब्ध आहे.पण सुमारे 17 साखर कारखाने आपल्या कार्यक्षेत्रातून ऊस अक्षरशः पळवतात. मात्र भीमा कारखान्याच्या वजन काट्यावर 100 ग्रॅम चा सुद्धा फरक येत नसल्यामुळे सभासदांचा विश्वास आहे.यंदाच्या हंगामात आपण सर्वांनी मिळून आठ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट गाठायचे आहे.त्यामुळे आपल्या सर्व सभासदांनी फक्त आपल्या हक्काच्या भीमालाच ऊस आपुलकी ने घालावा.अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरून उभा केलेल्या कोजनरेशन प्रकल्पामधून आपणास सुमारे 40 कोटी रुपयांचा जादा नफा होणार आहे.सलग दोन वर्षे आपण सर्वांनी निर्धाराने एकजुटिने 8 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पार पाडले तर सर्व अडचणी संपून कारखान्यासाठी सुवर्णकाळ येणार आहे. ही सोनेरी भविष्याची नांदी असून आपण सर्व सभासद,कामगार,
प्रशासन एकजुटिने पुढे जाऊ.”
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मार्ग काढून बहुमोल सहकार्य केल्याबद्दल श्री.महाडीक यांनी सर्व सभासदांच्या वतीने त्यांचे आभार मानले.तसेच येत्या दिवाळीसाठी सभासदांना 25 किलो साखर 25 रुपये प्रति किलो दराने साखर वाटप करण्याची घोषणा केली. कामगारांसाठी 8.33% बोनस पगाराची घोषणा करत असतानाच श्री. धनंजय महाडिक भावनाविवश होऊन पुढे म्हणाले,” यंदाचा गाळप हंगाम तोंडावर आलेला असताना कामगारांनी कामबंद आंदोलन केले त्यामुळे मनस्वी दुःख झाले.भीमा कारखाना हे माझे कुटुंब असून मी पालनकर्ता आहे.ज्या संस्थेने आपल्याला,
आपल्या कुटुंबाला आयुष्यभर सांभाळलं ती ही संस्था म्हणजे तुमची आमची लक्ष्मी आहे, दौलत आहे. आंदोलनामुळे मार्ग निघत नसतात उलट परिस्थिती जास्त चिघळते.तेव्हा इथून पुढे अशा प्रकारची ऊपोषण-आंदोलने न करता आपण सर्वजण एकजुटीने,आनंदाने, उत्साहाने आपल्या भीमा कारखान्याची प्रगती करू या.गत निवडणुकीत 5500च्या फरकाने निवडून आलो होतो तर आगामी निवडणुकांमध्ये 8000च्या बहुमताने निवडून यायचं असून आपणा सर्वांची आम्हाला साथ हवी आहे.मात्र आपण बाहेरील शक्तींच्या भूलथापांना व अफवांना बळी न पडता आपल्याच कारखान्याला सर्व सभासदांनी ऊस घालावा असं विनम्र आवाहन करतो.”
चौकट-
भीमा ‘डुबाओ ‘समिती मुळेच बीलांना विलंब व मानसिक त्रास!
“ह्या भीमा बचाव नव्हे तर ‘डुबाओ’ समितीने कोल्हापूरच्या मंत्री महोदयांशी संधान साधून वेळोवेळी निर्माण केलेल्या अडथळ्यांमुळे मला व सर्वच सभासदांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.त्यांनी केलेल्या खोट्या तक्रारीमुळे आरआरसीच्या कारवाई अंतर्गत कारखान्याच्या 7 गोडाउन मध्ये शेकडो कोटी रुपयांची साखर विनाकारण 18 महीने अडकून विक्रिविना पडून राहिली व सभासदांना ऊसबीलास देण्यास विलंब लागला. विरोधकांनी खोट्या तक्रारी दिल्या नसत्या तर आज दिली गेलेली ऊसबिले आठ महिन्यांपूर्वीच देता आली असती व सभासदांचा मानसिक त्रास झाला नसता. ही बाब सभासदांच्या पूर्ण लक्षात आली असून सभासद त्यांना मतपेटीतून उत्तर देतील”
मा.खा.धनंजय महाडीक,
चेअरमन भीमा स.सा. कारखाना टाकळीसिकंदर