पंढरपूर : ( दि.11) – कुपोषण टाळण्यासाठी व मुलांचे संगोपन नीट व्हावे यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र सुरु करण्यात आली आहेत. उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथील पोषण पुनर्वसन केंद्रात सन 2016 ते जानेवारी 2022 या कालावधीत 0 ते 5 वर्ष वयोगटातील 809 कुपोषित मुलांवर उपचार करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदिप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे पोषण पुनर्वसन केंद्र सुरु आहे.पोषण पुनर्वसन केंद्रात 14 दिवसांसाठी दाखल करण्यात येणाऱ्या बालकांना दर तीन तासाला पौष्टिक आहार ,औषध उपचार तसेच पालकांना प्रतिदिन 300 रुपये प्रमाणे 14 दिवसांची 4200 रुपये बुडीत मजुरी म्हणून देण्यात येते. त्याबरोबर पालकांना दोन वेळचा चहा, नाष्टा आणि जेवण दिले जाते तसेच चार फॉलोअप मध्ये बालकाची वजन वाढ तपासली जाते. दाखल मुलांची सुमारे 95 टक्के वजन वाढ झाली आहे. असेही वैद्यकीय अधिक्षक डॉ.गिराम यांनी सांगितले.
पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम,,बालरुग्ण विभाग, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत उपचारासाठी बालके दाखल होतात. पोषण पुनर्वसन केंद्राच्या बालरोग तज्ञ डॉ. वर्षा पाटील या सर्व वैद्यकीय तपासण्या व औषधोपचाराचे कामकाज पाहतात. बाळाच्या वजन वाढीसाठी आहार नियोजन, मातांना आहार समुपदेशन, कमी पैशात पौष्टिक पाककृती मार्गदर्शन, समतोल आहार, राष्ट्रीय पोषण महिना, स्तनपान सप्ताह व विविध उपक्रमातून या केंद्रात आहार तज्ञ श्रीमती अमृता इनामदार जनजागृती करतात.