
उजनी जलाशयातून अवैध मार्गाने होणाऱ्या वाळू उपशावर शासनाने निर्बंध घालावेत
तीन तालुक्यातील क्षेत्रात वाळूचे लिलाव ठरवून द्यावेत,शासनाकडे कोट्यावधी रुपयाचा महसूल जमा होईल: बबनराव शिंदे
उजनी धरणाच्या यशवंत जलाशयामध्ये गाळ मिश्रित वाळूचा हजारो मेट्रिक टन साठा असून बॅकवॉटर क्षेत्रातील अनेक ठिकाणाहून अवैधरित्या चोरट्या मार्गाने राजरोस वाळूचा उपसा होत आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने निर्बंध आणावेत व तसेच माढा करमाळा आणि इंदापूर तालुक्यातील बॅक वॉटर लगतच्या कांही ठिकाणी वाळूचे लिलाव ठरवून देऊन शेकडो कोटी रुपयांचा महसूल शासनाने तिजोरीत जमा करावा अशी मागणी मा.आमदार बबनदादा शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,जलसंपदा मंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री, संबंधित सर्व खात्याचे प्रमुख सचिव व सोलापूर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आलेल्या आहेत.
अधिक माहिती अशी की मागील 40 ते 42 वर्षांमध्ये उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रत्येक वर्षी येत असलेल्या पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाळू मिश्रित गाळाची साठवण झालेली आहे. एका अभ्यासानुसार किमान 50 ते 60 हजार मेट्रिक टन गाळ व वाळू जलाशयातून बाजूला काढता येईल. शासनाने सध्या ‘गाळमुक्त धरण’ व ‘ ‘गाळयुक्त शिवार’ ही योजना सर्वत्र राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार उजनी धरणातील हजारो मेट्रिक टन गाळ काढून तो शेतकऱ्यांना शेतामध्ये टाकण्यास देणे हिताचे ठरणार आहे. मागील कांही वर्षापासून बॅकवॉटर मधून दररोज हजारो ब्रास वाळूची चोरी होत आहे ती रोखणे महत्त्वाचे आहे. ही वाळू गाळमिश्रित असली तरी पण गाळापासून स्वच्छ करून बाहेर काढली जाते व
लक्षावधी रुपये गैरमार्गाने ठेकेदार कमावतांना दिसून येतात. यासाठी शासनाने तातडीने प्रतिबंध करून वाळू चोरीस आळा घालणे आवश्यक आहे, म्हणून उजनी जलाशय बॅकवॉटर लगत असलेले करमाळा, माढा व इंदापूर तालुक्यातील संबंधित गावच्या हद्दीत व्यापलेल्या वाळू क्षेत्राचा लिलाव करून शासनाने आपल्या तिजोरीत कोट्यावधी रुपये महसूल जमा करावा. यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावेत तसेच पुणे व सोलापूर च्या जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार धरण नियंत्रण विभागाचे अधिकारी व पोलीस यंत्रणा या सर्वांनी एकत्र येऊन ठिकठिकाणच्या वाळूचे लिलाव होण्यास मदत करावी, त्यामुळे नागरिकांना देखील योग्य व माफक दरात वाळू व शेतकऱ्यांना शेतात पसरण्यासाठी गाळ मिळू शकेल .
१२ टीएमसी पाणीसाठा वाढणार
उजनी धरण हे सपाट क्षेत्रावर तयार करण्यात आलेले आहे, याच्या सभोवती कुठेही डोंगर ,कपाऱ्या किंवा झाडी, जंगल नाही. यामुळे
उजनी धरण जेव्हा 100% पूर्ण क्षमतेने भरते तेव्हा धरणाचे पाणी 345 ते 350 चौरस किलोमीटर म्हणजेच 35 ते 40 हजार एकर क्षेत्रामध्ये पसरलेले असते. प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे , मागील 40 ते 42 वर्षांमध्ये या धरणामध्ये पन्नास ते साठ हजार मेट्रिक टन वाळू मिश्रित गाळ साठलेला आहे असा तज्ञ अभ्यासाकांचा लेखी अहवाल आहे. ही वाळू आणि गाळ बाहेर काढल्यास धरणाची खोली वाढून पाणीसाठ्यात बारा ते चौदा टीएमसी ने वाढ होणार आहे. सध्या उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी पाणी कमी पडते मात्र गाळ व वाळू काढल्यास हे पाणी कमी पडणार नाही हे निश्चित.