
पंढरपूर वारीदरम्यान मृत्यू झाल्यास वारकऱ्याला ०४ लाखांची आर्थिक मदत; शासनाचा मोठा निर्णय
विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी जाणारे हजारो वारकरी शेकडो मैल अंतर कापत पंढरपुरात येतात . 250 किमीच्या प्रवासात काट्या कुट्यातून,चिखलातून माऊलीचा गजर करत पंढरीच्या वारीला निघतात. यंदा महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून वारीदरम्यान कोणत्याही प्रकारच्या अपघातात वारकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे .यासंदर्भातलं नवं परिपत्रक महसूल विभागाने आज जाहीर केला आहे .
या निर्णयामुळे वारीदरम्यान घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमध्ये वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळणार आहे. 16 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत वारीदरम्यान जर एखाद्या वारकऱ्याचा अपघात, विषबाधा किंवा इतर नैसर्गिक कारणामुळे मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबीयांना ही रक्कम मिळणार आहे. मात्र आत्महत्येच्या घटनांमध्ये ही मदत लागू होणार नाही. याशिवाय, वारीदरम्यान अपघातामुळे अपंगत्व आल्यास देखील आर्थिक मदतीची तरतूद आहे.
मदतीची तरतूद काय?
अपघाताने व दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसदारांस ०४लाखांची मदत
वारीदरम्यान अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ७४०००
६० टक्क्यांवरून अधिक अपंगत्व आल्यास 2.50 लाख
एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी इस्पीतळात दाखल झाल्यास १६००० रुपये तर एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी दाखल असल्यास ५४००रुपयांची मदत