प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा ताबडतोब मोबदला द्या!
(आ. बबनदादा शिंदे यांची जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे रीतसर मागणी)
सोलापूर // प्रतिनिधी
सीना माढा योजनेचे काम 2004 मध्ये करण्यात आले 17 वर्षे झाली परंतु अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्यामुळे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत त्याचा मोबदला मिळालेला नाही प्रलंबित असणाऱ्या या सर्व प्रकरणांचे तातडीने संयुक्त पंचनामे व मूल्यांकन करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी अशी मागणी आमदार बबनराव शिंदे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.
पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले की गेल्या दोन वर्षांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे मागणी करून निधीची उपलब्धता करून घेतलेली आहे शेतकऱ्यांच्या भूसंपादन कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली असल्याने शेतकर्यांचे भूसंपादनाचे पैसे त्यांना मिळावेत यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
याबाबत अधिक माहिती अशी की सीना माढा योजनेचे कॅनॉल ची कामे केलेल्या निमगाव बादलेवाडी पिंपळनेर शेडशिंगे लऊळ उजनी चिंचोली होळे भेंड अरण वरवडे जाधववाडी बैरागवाडी यासह अनेक गावातील शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या काळात प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिल्या त्यावेळी कामे सुरु होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी मदत केली आता जमिनीचा मोबदला देण्यासाठी नुकसान भरपाईची रक्कम देण्यासाठी मागणी केली असता संयुक्त पंचनामे होत नाहीत तर पंचनामे झालेल्या लोकांचे मूल्यांकन होत नाही मोजणी करण्यासाठी अपुरा कर्मचारी वर्ग आहे अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पासून वंचित राहावे लागले आहे.
यासाठी आमदार बबनराव शिंदे हे वेळोवेळी शासन स्तरावर जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठका घेऊन पाठपुरावा करत आहेत परंतु जलसंपदा विभाग महसूल कृषी विभागातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे त्याचा फटका मात्र गोरगरीब शेतकऱ्यांना बसत आहे.