राष्ट्रवादी मंथनः वेध भविष्याचा. • शिर्डी येथे ४, ५ नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अभ्यास शिबिर• महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने ४ आणि ५ नोव्हेंबर २०२२ रोजी शिर्डी येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्याचे वर्तमान स्थितीसंदर्भातील आकलन वाढावे, भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे आणि राष्ट्र तसेच समाजाबद्दलची बांधिलकी भक्कम व्हावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा’ या शिबिरामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद पवार साहेब, विधानसभेतील विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्यातील विविध क्षेत्रातील विचारवंत, अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाच्यावतीने सभासद नोंदणी मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे. ही मोहीम गतिमान करून ग्रामीण तसेच शहरी भागात कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे निर्माण करण्यात येत असून शिबिराच्या माध्यमातून या मोहिमेला चालना देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना होऊन तेवीस वर्षे झाली असून येत्या जून महिन्यामध्ये पक्ष रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करेल. पक्षाचे अध्यक्ष आणि देशाचे नेते आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वाटचाल करणा-या पक्षाने आपल्या २३ वर्षाच्या वाटचालीमध्ये महाराष्ट्रासाठी मोठे योगदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा प्रमाण मानून राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाटचाल दमदारपणे सुरू राहिली आहे. पक्षाचा वैचारिक पाया भक्कम असल्यामुळे महाराष्ट्रापुढे निर्माण झालेल्या अनेक आव्हानात्मक प्रश्नांच्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आदरणीय पवार साहेबांनी राज्याला योग्य दिशा दाखवली. पक्षाच्या अंतर्गत काम करणा-या विविध संघटनांनी वेळोवेळी आपली भूमिका उत्तमपणे पार पाडली. त्याचमुळे महाराष्ट्रातील सुजाण आणि परिवर्तनशील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठबळ दिले. अलीकडच्या काळामध्ये भक्कम संघटनात्मक बांधणीसाठी प्रयत्न करणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे. प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील यांनी त्यासाठी चांदा ते बांदा परिवार संवाद यात्रा काढून तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाचा विचार पोहोचवला. त्याचे परिणाम नंतरच्या काळात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसून आले. नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर राहिला. अलीकडे ग्रामपंचायत निवडणुकीतही पक्षाने लक्षणीय यश मिळवले. जनतेच्या अशा पाठबळामुळेच आजवरच्या २३ वर्षांच्या प्रवासातील साडेसतरा वर्षे पक्ष राज्याच्या सत्तेमध्ये राहिला. पवार साहेबांनी सातत्याने केलेली विचारांची पेरणी आणि दुस-या फळीतील नेत्यांनी केलेली मशागत यामुळे प्रत्येक आघाडीवर पक्षाने अग्रभागी राहून आपली भूमिका बजावली. समविचारी पक्षांना सोबत घेऊन वैचारिक लढाई लढली. हीच परंपरा अधिक व्यापक आणि गतिमान करण्यासाठी शिर्डी येथे ‘राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा` या अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज देशापुढे आणि राज्यापुढे अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. २०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना कार्यकर्त्यांची मनोभूमिका अधिक बळकट होण्याची आवश्यकता आहे. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांना दहशतीखाली ठेवण्यात येत आहे. केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने अडीच वर्षे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न झाले. केंद्रीय यंत्रणांची दहशत वापरूनच फोडाफोडी करून महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यात आले. केंद्रातील सत्ताधा-यांच्या कारभारामुळे देशापुढे अनेक प्रश्न गंभीर स्वरुपात उभे राहिले आहेत. वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने नांदणा-या या देशातील काही समाजघटकांना सतत भीतीच्या छायेखाली ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. समाजामध्ये फूट पाडण्याचे तसेच विद्वेष निर्माण करण्याचे काम सत्तेच्या माध्यमातून केले जात आहे. घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण करण्याची मोहीम राबवली जात आहे. लोकशाही पद्धतीने आवाज उठवणा-या विद्यार्थ्यांपासून अभ्यासकांपर्यंतच्या विविध घटकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पगारी ट्रोल्सच्या टोळ्या पोसून पत्रकारांपासून कलावंतांपर्यंत विविध घटकांचा छळवाद मांडला जात आहे. आर्थिक आघाडीवर प्रचंड अपयश आले असून त्यापासून समाजाचे लक्ष भलतीकडे वळवण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवण्यात येत आहेत. २०१४ पूर्वी रुपयाच्या घसरणीचा ठपका तत्कालीन पंतप्रधानांवर ठेवणारे लोक आता रुपयाच्या अभूतपूर्व घसरणीचेही लंगडे समर्थन करू लागले आहेत. बेरोजगारीच्या संकटाने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले असून त्याबाबत कुठल्याही टप्प्यावर गांभीर्य दिसत नाही. महागाई आकाशाला भिडली असून त्यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. शिक्षणापासून सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत इतिहासाचे विकृतीकरण खरून खोटा इतिहास थोपवण्याचे प्रयत्न सत्तेच्या माध्यमातून सुरू आहे. अनेक पातळ्यांवरचे अपयश लपवण्यासाठी धार्मिक मुद्द्यांच्या आड लपण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशासमोर, राज्यासमोर अनेक प्रश्न असताना व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करून लोकांना संभ्रमित करण्याचे प्रयत्न सत्ताधा-यांकडून केले जातात. या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांसंदर्भातील नेमके वास्तव काय आहे, त्यासंदर्भातील नेमकी आव्हाने कोणती आहेत आणि त्यांना सामोरे कसे जाता येईल यासंदर्भातील मंथन शिबिरामध्ये करण्यात येणार आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून पक्षाचा डिजिटल चेहरा अधिक प्रभावी बनवण्यात येत आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांबरोबरच विविध क्षेत्रातील अभ्यासक, विचारवंत, पत्रकार विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. दोन दिवसांचे हे शिबिर पक्षाच्या निमंत्रित पदाधिका-यांसाठी आहे
सोलापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे ग्रामीण मधून सुमारे ५० पदाधिकारी व शहर राष्ट्रवादीचे सुमारे २५ पदाधिकारी या दोन दिवसीय शिबीरामध्ये सहभागी होतील.
Home ताज्या-घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिर्डी येथे ०४ व ०५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी...