महार वतनाच्या जमिनी विभाजन करून द्या – अनिल पाटील
महार वतनाच्या जमिनीवर असणाऱ्या क्षेत्रामध्ये वारसांची जास्त नावे असल्याने ही जमीन कोणालाही करता येत नाही, त्यामुळे त्या गटाची शासनामार्फत गट विभाजन करुन त्याच्या अक्काच्या जमिनी त्याना मिळवून देण्यात यावेत अन्यथा मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला. मोहोळ येथील बालोद्यान येथे सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणले की, मोहोळ तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक गावात महार वतनाच्या जमिनी आहेत मात्र या जमिनीवर वारसांची संख्या जास्त झाल्याने जमिनी असून देखील ती कसण्यास मिळत नाहीत. यासह अनेक धनदांडग्या श्रीमंतांनी याचा लाभ उठवीत त्या जमिनी कवडीमोल किमतीने विकत घेतल्या आहेत तर अनेक जमिनी उताऱ्यावर अनेक नावे असल्या कारणाने पडीक आहेत.
राजकीय व्यक्तींनी आत्तापर्यंत या समाजाचा फक्त फायदाच उठवला आहे मात्र जमिनीचे गट विभाजन करण्यासाठी पुढाकार घेतलेला दिसून येत नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रशासनाने स्वतःच्या अधिकाराचा वापर करत महार व इतर वतनाच्या जमिनीवर जेवढ्या कुटुंबांची नावे आहेत त्या सर्वांना गट विभाजन करून त्यांची हक्काची जमीन उपलब्ध करून देण्यात यावी अन्यथा मंत्रालयाच्या समोर आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी दिला आहे यावेळी अभिजीत नेटके हे उपस्थित होते.