पंढरपूर (दि.08):- उजनी धरण पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने उजनी धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सध्या भीमा नदीपात्रात 61 हजार 600 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले असल्याने नदी पात्रात पाण्याच्या पातळी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. नदीकाठच्या तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील नागरिकांनी गणेश विसर्जन करताना सुरक्षेबाबत योग्यती काळजी घ्यावी तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.
मागील दोन वर्षात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भावामुळे कोणतेही सण साजरे झाले नाहीत. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गणोशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. दिनांक 9 सप्टेंबर 2022 रोजी गणेश विसर्जन असल्याने विसर्जनासाठी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नदीपात्राकडे जाणाऱ्या मार्गावर तसेच दगडी पुल व बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेट लावण्यात यावेत. शहरात व ग्रामस्तराव सुरक्षेबाबत सूचना फलक लावण्यात यावेत. तसेच नागरिकांना लाऊड स्पिकरव्दारे वेळोवेळी सूचना द्याव्यात. यासाठी सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याची मदत घ्यावी. आपत्ती व्यवस्थापनातंर्गत नगरपालिका व तहसिल कार्यालयाने नदीपात्रात बोटीची व्यवस्था करावी अशा सूचना प्रांताधिकारी गुरव यांनी दिल्या.
नदीपात्रात खाजगी होडी जाणार नाहीत यांची दक्षता जलसंपदाविभागाने घ्यावी. नगरपालिका तसेच ग्रामपंचायतीनी विसर्जन ठिकाणी पुरेशा प्रकाशाची व्यवय्था करावी. पोलीस प्रशासनाने नदीपात्रातील वाढती पाणी पातळी व गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेवून पुरेसा पोलीस बंदोबस्त नेमावा.
ग्रामपंचायत व नगरपालिका विभागाने विविध ठिकाणी मुर्ती संकलन केंद्र उभारावीत. तसेच त्याठिकाणी वापरण्यात येणारी वाहने व निर्माल्य कलश हे धार्मिक स्वरुपात व आकारात तयार करण्यात यावीत. गणेश विसर्जन करण्यासाठी नदी पात्रातील बॅरिकेट्स ओलांडू नये. लहान मुले, व जेष्ठ नागरिक यांनी नदीपात्राच्या ठिकाणापासून दूर रहावे. तसेच खाजगी होडीतून गणेश विसर्जन करुन नये असे आवाहनही श्री गुरव यांनी यावेळी केले.