मंगळवेढा तालुक्यामध्ये अनेक गरीब लाभार्थी हे अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नाहीत त्यामुळे त्यांना रेशनचे धान्य मिळत नाही. सध्या तालुक्याला पाच हजार लाभार्थ्यांना समाविष्ट करण्याचा इष्टांक प्राप्त झाला असून प्रत्येक ग्रामपंचायतीने योजनेच्या निकष व अटीमध्ये बसणाऱ्या लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत.त्यांचा या योजनेमध्ये समावेश करून त्यांना धान्य वितरित केले जाईल अशी माहिती मंगळवेढ्याचे तहसीलदार मदन जाधव यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या गाव भेट दौऱ्यादरम्यान दिले आहे.
गावोगावी पात्र लाभार्थ्यांना रेशनचे धान्य मिळत नसून धनदांडग्या लोकांचा या योजनेमध्ये समावेश आहे अशा तक्रारी आमदार समाधान आवताडे यांच्या गाव भेट दौऱ्या दरम्यान होत आहेत .त्यामुळे तहसीलदार जाधव यांनी पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायतीने कार्यालयाकडे कळवण्याच्या सूचना दिले आहेत.
दि 12 रोजी हिवरगाव,खोमनाळ,भाळवणी, चिखलगी, मारोळी,शिरनांदगी,रड्डे, सिद्धनकेरी गावचा गाव भेट दौरा केला. यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी विविध खात्यांच्या अधिकाऱ्याकडून गावात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत नागरिकांच्या तक्रारीचे निवारण केले.
यावेळी भाळवणी येथील एका नागरिकाने मरवडे आरोग्य केंद्रात असलेले डॉक्टर रुग्णांशी व्यवस्थित बोलत नाहीत अशी तक्रार केल्यानंतर आमदार आवताडे यांनी डॉक्टरांना मी लोकप्रतिनिधी आहे, नीट बोलतोय याचा अर्थ मी काही करणार नाही असे समजू नका,पुन्हा तक्रार आली तर गय करणार नाही अशी तंबी दिली. रड्डे येथील उपकेंद्रात डॉक्टर येत नसल्याचे तक्रार नागरिकांनी केल्याने त्यांनाही कारणे दाखवा नोटीस काढण्याच्या सूचना देत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ जानकर यांना आरोग्याच्याबाबतीत मी कोणत्याही अधिकाऱ्याची गय करणार नाही अशा सूचना दिल्या .
निंबोनी येथे मंजूर झालेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा आढावा घेतला असता त्या जागेवर अनेक लोकांनी अतिक्रमण केले असल्याचे भारत ढगे यांनी सांगितल्यानंतर तहसीलदारांना त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्याच्या सूचनाही आमदारांनी दिल्या.
या दौऱ्यामध्ये विविध खात्याचे अधिकारी , पदाधिकारी, त्या त्या गावचे सरपंच,उपसरपंच, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वनविभाग व महावितरण चा प्रश्न अधिवेशनात मांडणार
वनविभागाने ग्रामपंचायत ची परवानगी न घेता अनेक जागा स्वतःच्या ताब्यात घेतल्याच्या तक्रारी काही गावांमध्ये येत असून त्या संदर्भातील प्रश्न या अधिवेशनात मांडणार असल्याचे आ.आवताडे यांनी सांगितले. त्याचबरोबर महावितरण ने 2010-11 साली महावितरण आपल्या दारी अंतर्गत भरून घेतलेल्या वीज कनेक्शन चे जोड दिलेले नाहीत मात्र त्या शेतकऱ्यांना लाखोंची बिले आली आहेत .सध्या ही योजना बंद झाल्याचे सांगून त्या लोकांना नवीन कनेक्शन भरायला सांगितले जात आहे. यासंदर्भातही अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी गाव भेट दौऱ्यात सांगितले.
सध्या पाऊस लांबल्यामुळे गावोगावी पाण्याची टंचाई भासत असून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर नागरिकांचा रोष दिसून आला. जलजीवन योजनेची कामे,भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांमधील कामांमध्ये अधिकाऱ्यांनी केलेला हलगर्जीपणा व वेळेत न काम केल्याने अनेक नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात आमदार आवताडे यांच्यासमोर रोष व्यक्त करत अधिकाऱ्यांच्या तक्रारी केल्या.