
आमदार अभिजीत पाटील यांनी स्वतः मंजूर करून आणलेल्या कामाचे उद्घाटन करावे:गोरख शेळके
(आमदार झाल्यापासून एक रुपया तरी मतदार संघासाठी निधी आणलाय का..?)
शासनाकडून माढा विधानसभा मतदार संघासाठी स्वतः मंजूर करून आणलेल्या कामाचे आ. अभिजीत पाटील यांनी उद्घाटन करावे, बबन दादांच्या प्रयत्नांनी मंजुरी मिळालेल्या कामाचे पुन्हा उद्घाटन करून स्वतःचे हसे करून घेऊ नये, कारण खरं आणि खोटं जनतेला सगळं माहित आहे असे प्रतिपादन परितेचे माजी सरपंच गोरख शेळके यांनी केले आहे .
वृत्तांत असा की परिते या गावी कॅनॉल बागायती क्षेत्र असल्यामुळे माजी आमदार बबन दादा शिंदे यांनी ३३ /११ के व्ही ए चे विद्युत सबस्टेशन पूर्वीच मंजूर केले होते व या ठिकाणी पाच एम व्ही ए चा ट्रांसफार्मर बसवला होता, परंतु दोन-तीन वर्षानंतर शेतीसाठी पाण्याची कनेक्शन्स वाढले व विद्युत पुरवठा कमी पडू लागल्यामुळे पुन्हा पाच एम व्ही ए चा ॲडिशनल ट्रान्सफर मंजूर करून घेतला व तो आणून देखील बसवला व त्याचे उद्घाटन दूध संघाचे अध्यक्ष रणजीत शिंदे यांच्या हस्ते पार पडले, या प्रसंगी शेकडो नागरिक उपस्थित होते व त्यामुळे आता गावाचा शेतीसाठी विद्युत पुरवठा योग्य पद्धतीने योग्य दाबाने चालू आहे .परंतु त्यानंतर विद्यमान आमदार अभिजीत पाटील,स्वतः सगळे प्रयत्न केले असल्यासारखे भासऊन परिते येथे येऊन नारळ फोडून उद्घाटन केले आणि मोठ्या अविर्भावात भाषण ठोकून कार्यकर्त्यांना खुश करून निघून गेले. परंतु येथील ८० टक्के जनतेने या कृत्याचा उपहास आणि निषेध केला आणि नाराजी पण व्यक्त करत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना दमात बोलून उद्घाटनाचा फार्स घडवून आणायचा एवढा सध्या उद्योग त्यांचा दिसतो असेही शेळके यांनी म्हटले आहे.
मतदार संघासाठी एक रुपया तरी आणलाय का:- महादेव मोरे
मा. सरपंच महादेव मोरे म्हणाले की आमदार झाल्यापासून अभिजीत पाटील यांनी मतदारसंघासाठी एक रुपया देखील आणला नाही., तेव्हा त्यांनी खोट्या बतावण्या करून माजी आमदार बबनदादांनी मंजूर करून आणलेल्या कामाचे उद्घाटन करण्याचा त्यांना अधिकार नाही . फक्त वाजत गाजत यायचं … नारळ फोडायचा… खोटं पण रेटून भाषण ठोकायचं .. आणि निघून जायचं. पण यामुळे जनतेमध्ये सध्या अभिजीत पाटील हे नारळ फोड्या आमदार म्हणून जास्त ओळखले जाऊ लागले आहेत. आतापर्यंत बबनदादांनी माढा मतदारसंघासाठी वीस गावासाठी ॲडिशनल पाच एम व्ही ए चे ट्रान्सफॉर्मर्स एक वर्षा पूर्वीच मंजूर करून आणले आहेत तर मतदार संघात १७ ठिकाणी ३३/११ च्या के व्ही ए च्या विद्युत सबस्टेशनला मंजुरी मिळवून आणली आहे. हे उघड सत्य अभिजीत पाटलांनी स्वीकारले तर त्यांना कमीपणा येणार नाही
आयत्या पिठावर कशासाठी रेघा ओडता:लक्ष्मण कदम
याप्रसंगी मा. ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कदम म्हणाले की माजी आमदार बबनदादांनी या मतदारसंघात १०० कोटी रुपयांची कामे पूर्वीच मंजूर करून आणलेली आहेत. यामध्ये रस्ते, वीज पाणी, जलसिंचन व इतर अनेक बाबीसाठी निधी देखील मंजूर झालेला आहे, पण विद्यमान आमदार अभिजीत पाटील हे फुकटचे श्रेय लाटण्यात आणि आयत्या पिठावर रेघा ओढण्यात तरबेज आहेत . ते वाळू माफीया असून बोलण्यात भलतेच पटाईत आहेत, परंतु जनता मात्र त्यांच्या या सर्व कृत्यांचा तीव्र स्वरूपात निषेध करत आहे. परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांना फुकटची ‘उब’ मिळत असल्यामुळे ते नुसत्या टाळ्या वाजवत आहेत, तो आबा आबा म्हणून जप करत आहेत.