
डॉ.यशवंत कुलकर्णी यांचा देशपातळीवरील “इंडस्ट्री एक्सलन्स”पुरस्काराने सन्मान!
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांना द शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली यांचा देशपातळीवरील “इंडस्ट्री एक्सलन्स” पुरस्कार आज रोजी माजी सहकार मंत्री श्री.हर्षवर्धन पाटील व माजी गृहमंत्री श्री. जयंतराव पाटील यांचे शुभहस्ते व वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटचे महासंचालक मा.श्री.संभाजी कडू पाटील आणि द शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्री. संजय अवस्थी यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सदर पुरस्काराचा स्विकार कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी केला.
डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली या देशपातळीवर साखर उद्योगामध्ये काम करणाऱ्या अग्रगन्य संस्थेकडून त्यांना देशपातळीवरील मानाचा समजला जाणारा “इंडस्ट्री एक्सलन्स” पुरस्कार जाहीर झाला होता. सदर पुरस्काराचे वितरण आज रोजी नवी दिल्ली येथे झाले.
डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सहकारी साखर कारखानदारी मध्ये केलेल्या अमुलाग्र बदलाची व सुधारणांची दखल देशपातळीवर घेण्यात आली. त्यामुळे यांची “इंडस्ट्री एक्सलन्स” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. डॉ.यशवंत कुलकर्णी यांना सहकारी साखर कारखानदारी मधील सुमारे वीस वर्षाचा प्रदिर्घ अनुभव असून त्यांनी या कार्यकाळामध्ये कारखान्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून साखर कारखानदारी नावारूपास आणलेली आहे. त्यांच्या कार्याला खरी सुरुवात कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर झाली. कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर त्यांनी कारखान्यांमध्ये अमुलाग्र बदल करून कामकाजामध्ये सुसूत्रता आणली. त्यांच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण कारखान्याचे संगणकीकरण, सुपंत बायो फर्टीलायझर लॅब, मोबाईल ॲपद्वारे ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार यांना माहिती, ऊस विकासाच्या विविध योजना, सभासद मेडिक्लेम योजना, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मानव विहिरीत वजन काटा, वृक्ष लागवड, कामगारांमध्ये शिस्त, ड्रेस कोड इत्यादी बाबींमध्ये प्रामुख्याने बदल करून एक प्रकारे कारखान्याच्या कामकाजामध्ये प्रगती केली. तसेच प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सर्व नियम पाळुन कारखान्यामध्ये आसवनी प्रकल्प, को-जनरेशन प्रकल्प, सौर उर्जा प्रकल्पाची उभारणी आणि कारखान्याचे आधुनिकीकरण करुन कारखान्यास आर्थिक स्त्रोत निर्माण केला आहे.
देशपातळीवरील द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली यांचा “इंडस्ट्री एक्सलन्स” पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक (मालक), व्हा.चेअरमन मा.श्री.कैलास खुळे, सर्व संचालक मंडळ, सर्व अधिकारी व कामगार यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या.