राष्ट्रवादी युवकचे श्रीकांत शिंदे यांची आरोग्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी
पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील सध्याचे आरोग्य केंद्र मोडकळीस आलेले आहे. वाखरीपासून पंढरपूर शहर 5 किमी अंतरावर तर भाळवणी हे 10 किमी अंतरावर आहे. वास्तविक यात्रा कालावधीत या दोन्ही ठिकाणी अत्यावश्यक सेवेसाठी पोहोचणे अत्यंत कठीण असते. वारकऱ्यांची मोठी गर्दी देखील असते. त्यामुळे जर वाखरी येथेच प्राथमिक आरोग्य केंद्र झाले तर त्याचा फायदा कौठाळी, खेडभोसे, शेळवे, पटवर्धन कुरोली यासह परिसरातील गावातील नागरिकांना होणार आहे. त्यामुळे वाखरी येथील आरोग्य केंद्रास 1.5 ते 2 कोटी रूपयांचा निधी मंजूर करून अद्ययावत आरोग्य केंद्र निर्माण करावे अशी आग्रही मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सचिव श्रीकांत शिंदे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पंढरपूरामध्ये वर्षाला चार यात्रा भरतात. त्यामध्ये आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी यात्रा असून या चारही यात्रेंमध्ये पालख्यांचा विसावा हा पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथेच असतो. वाखरी येथे वर्षानुवर्षे परंपरेने आषाढी वारीनिमित्त सर्व संतांच्या पालख्यांची मांदियाळी भरते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांमध्ये लाखो भाविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी यात्रेतील शेवटचे रिंगण इथेच पार पडते. यामुळे वाखरी या गावाला मोठे महत्व आहे. याचा गोष्टीचा विचार करावा व नागरिक, भाविकांसाठी लवकरात लवकर निधी मिळावा अशी ही आग्रही मागणी केलेली आहे. सदरचा निधी मिळावा म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सचिव श्रीकांत शिंदे व वाखरी ग्रामपंचायतीचे सदस्य संग्राम गायकवाड प्रयत्न करीत आहेत.
तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून प्रसूती शस्त्रक्रिया वगळू नये याबद्दल यापूर्वी दिनांक 30 जानेवारी रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आरोग्यमंत्री यांना निवेदन दिले होते त्याबाबत ही चर्चा झाली त्याबद्दल ही टोपे साहेब बोलताना म्हणाले की सर्वसामान्य जनतेला लाभदायक असणारी ही योजना लवकरच सुरू करू असे ही आश्वासन दिले. त्यामुळे आता ही योजनेचा पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळणार आहे, असेही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.