विजेशिवाय सर्वांगीण विकास शक्य नाही. त्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षात ऊर्जा विभागाने देदीप्य मान कामगिरी केली. राज्यात विजेची मागणी लक्षात घेता नव्या पर्यायांचा विचार करून विभागाने कृषीपंप वीज जोडणी धोरण, अपारंपरिक ऊर्जा धोरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना, सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण आदी योजनांच्या माध्यमातून ऊर्जा समृद्धीच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
डॉ. नितीन राऊत मंत्री, ऊर्जा
राज्यातील कृषि क्षेत्रात विकासामध्ये ऊर्जाक्षेत्राचा मोठा वाटा असून कृषि ग्राहकांना नवीन वीज जोडणी देणे व त्यांच्या वीजबिलाच्या थकबाकीचा प्रश्न सोडवण्याकरिता राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी असे अभिनव कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 जाहीर केले.
या कृषीधोरण 2020 नुसार 30 मीटरच्या आत सर्व कृषी ग्राहकांना तत्काळ वीज जोडणी मिळणार आहे. ज्या कृषिपंप अर्जदाराचे अंतर लघुदाब वाहिनीच्या 200 मीटरच्या आत आहे व रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्थ आहे, अशा नवीन कृषीपंप ग्राहकांना एरियलबंच केबलद्वारे तीन महिन्यात नवीन वीज जोडणी मिळणार आहे. वरील वीजजोडणी करिता आवश्यक असणारी लघुदाब वाहिनी एरियलबंच केबल स्वतःच्या खर्चाने उभारायची असून, त्यासाठी झालेल्या खर्चाचा 100% परतावा त्या ग्राहकांच्या वीज बिलामधून केला जाणार आहे. जर अर्जदार आर्थिक कारणामुळे खर्च करण्यास सक्षम नसेल, तर त्याला अर्जदारांच्या क्रमवारीनुसार व निधीच्या उपलब्धतेनुसार वीज जोडणी देण्यात येईल.
200 ते 600 मीटरच्या आत असलेल्या कृषी ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणालीचा (एचव्हीडीएस) पर्याय तसेच पारेषण विरहित सौरऊर्जेवरील पंपाचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. जुन्या थकबाकीवर 5 वर्षांपूर्वीच्या म्हणजेच सप्टेंबर 2015 पूर्वीच्या थकबाकीवरील विलंब आकार व व्याज माफ करण्यात येत आहे. तसेच 5 वर्षापर्यंतच्या म्हणजेच सप्टेंबर 2015 पर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार व व्याज आयोगाने ठरवलेल्या भांडवलावरील व्याजदरानुसार सुधारित थकबाकी संगणकात निश्चित करून चालू बिल वेळेत भरल्यास थकबाकी 3 वर्षांत भरण्याची मुभा राज्यातील सर्व कृषीग्राहकांना देण्यात आली आहे.
अपारंपरिक ऊर्जा धोरण
राज्याचे नवीन अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला चालना देण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा धोरण – 2020 तयार करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत राज्यात विजेची वाढती मागणी विचारात घेता पुढील पाच वर्षात 17,360 मेगावॅट इतकी पर्यावरणपूरक वीज क्षमता वृद्धीचे नवीन अपारंपरिक ऊर्जानिर्मिती प्रकल्प आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे.
जीवन प्रकाश योजना
14 एप्रिलते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणाद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय या योजनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या असंघटित उद्योगामधील वीजपुरवठ्या संबंधी असणार्या तक्रारी/ समस्यांचे निवारण करण्याबाबतही समावेश असेल.