पंढरपूर (दि.17):- साखर उद्योग शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांचे अर्थचक्र कारखानदारीवर अवलंबून असल्याने राज्यातील कुठलाही साखर कारखाना बंद राहता कामा नये ही राज्य शासनाची भूमिका आहे, असे प्रतिपादन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड चंद्रभागा नगर येथील 2020- 21 च्या 22 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, कार्यकारी संचालक झुंजार आसबे, ह भ प जयवंत महाराज बोधले, उपप्रादेशिक सहसंचालक पांडूरंग साठे, उपनिबंधक श्री.तांदळे यांच्यासह कारखान्याचे संचालक तसेच शेतकरी सभासद उपस्थित होते.
यावेळी श्री पाटील बोलताना म्हणाले, राज्यातील जे साखर कारखाने बँकांच्या ताब्यात आहेत आणि अनेक वर्षे बंद आहेत. त्या भागातील ऊस गाळपास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. ग्रामीण उद्योगास चालना मिळण्यासाठी असे कारखाने सुरू करणे आवश्यक आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी असे सहकारी साखर कारखाने दीर्घ मुदतीने भाडे तत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
सोलापूर हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळख आहे. उजनी धरणाच्या निर्मितीमुळे या जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच आता शेतकरीही शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने उसाच्या हेक्टरी उत्पादनातही वाढ झाली आहे. त्यादृष्टीने कारखान्यांनीही बदल करणे आवश्यक आहे. यासाठी साखर कारखान्यांनी साखरेची उत्पादकता वाढविण्याबरोबरच उपपदार्थ निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता आहे. राज्यात गेल्यावर्षी 1013 लाख टन गळीत झाले असून यावर्षी त्यामध्ये वाढ होऊन 80 ते 82 लाख टनाने गळपात भर पडणार असल्याचे सहकारमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले