तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत असून युवा वर्गामध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था कोलमडत असून हे थांबवण्यासाठी कोटपा 2003 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय, सोलापूरचा तंबाखू नियंत्रण कक्ष आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांच्यावतीने जिल्ह्यातील शासकीय अधिकारी-कर्मचारी यांची कार्यशाळा आयोजित केली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नितीन राऊत आदी उपस्थित होते.
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, तंबाखू या विषयाची गंभीरता खूप आहे. तंबाखू शरीरासाठी अपायकारक असून याचे सेवन करू नका. तंबाखू खाण्याने काय होते, याची माहिती आपल्या कुटुंबाला, शेजाऱ्याला, मित्राला, नातेवाईकांना द्या. जास्तीत जास्त लोकांना याबाबत माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.
श्रीमती पवार यांनी सांगितले की, पुढच्या पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी तंबाखूचे सेवन करू नका. तंबाखू खाण्याची ज्यांना सवय आहे, त्यांनी सोडण्याचा प्रयत्न करावा. कायदा करून तंबाखू सुटणार नाही, यावर प्रबोधन होणे आवश्यक आहे.
कार्यशाळेत कोटपा 2003 अंतर्गत कलम 4 व 6 ची माहिती राज्याधिकारी जिया शेख यांनी दिली. कलम पाच आणि सात यांची माहिती विभागीय अधिकारी अभिजित संघई यांनी दिली. सिव्हील हॉस्पिटलचे डॉ. निलेश कोकरे यांनी तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्या वतीने चालणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.
सूत्रसंचालन विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी यांनी केले तर आभार समुपदेशिका मंजुश्री मुळे यांनी मानले. कार्यशाळेला गणेश उगले, अमित महाडिक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.