चालू आठवड्यामध्ये दिवसाच्या तापमानामध्ये मोठी वाढ झाल्याने भूजल पातळी खालावून सोलापूर जिल्ह्यातील सर्वच विहिरींचे पाणी अचानकच कमी झाले असून कालव्यावर आधारित पिके जळून चालली आहेत. द्राक्ष बागा,डाळिंब बागा इतर बागपिके तसेच भाजीपाल्याची शेती यावर विपरीत परिणाम होत असून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना बोअरवेल माराव्या लागत आहेत. डिझेलचे दर गगनाला भिडल्यामुळे बोअरवेल चा प्रति फूट दरही वाढला असून शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता करण्यासाठीच्या खर्चाचा भुर्दंड विनाकारण सोसावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पाटबंधारे विभागाच्या शेतीसाठीच्या पाण्याच्या नियोजन शून्यतेमुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. सक्तीच्या कृषी पंप वीज बिल वसुलीमुळे शेतकऱ्याच्या पिकांना या अगोदरच अनेक वेळा आचका बसल्यामुळे शेती नुकसानी मध्ये गेलेली आहे. सध्या तीव्र उन्हाळ्याला सुरुवात झाली असून आता उजनी धरणामध्ये पुरेसे पाणी शिल्लक असताना उन्हाळी आवर्तनाचे नियोजन वेळेवर का केले जात नाही? शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी देणे हे एक दैनंदिन कामकाज व अधिकाऱ्यांचे कर्तव्य असून याचे नियोजन चोखपणे व काळजीने का होत नाही? हा बेजबाबदारपणा नेमका कशासाठी? शेतकऱ्यांच्या बाबतीत एवढी अनास्था का दाखवली जाते? शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाला कोण जबाबदार? एकदा पिके जळून गेल्यानंतर मागून कालव्याला पाणी सोडून काय उपयोग? प्रत्येक वेळी मागणीचे निवेदन देण्याची गरज का पडावी? पाटबंधारे अधिकारी पाटबंधारे मंत्रालय व शेतकरी असा समन्वय का राहत नाही? असे अनेक संतप्त सवाल विचारून सोलापूर जिल्हा किसान कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.संग्राम चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे जिल्हाधिकारी सोलापूर यांचे लक्ष वेधून घेतले व कालव्याला शेतीसाठी त्वरित पाणी सोडण्यासाठी मागणी केली.