पंढरपूर दि. 06 :- कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्य हितासाठी प्रशासनाकडून लसीकरणाचे दोन ठोस घेणे अनिवार्य केले असून लसीकरण न केलेल्या नागरिकांना कोणताही शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तसेच शासकीय कार्यालयातील अधिकारी -कर्मचारी यांनी दोन डोस घेतल्या बाबतचे प्रमाणपत्र सादर करावे अन्यथा संबधित कर्मचाऱ्याचे वेतन अदा करण्यात येऊ नये असे, निर्देश प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिले.
पंढरपूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील कोरोना लसीकरणाबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीस तहसिलदार सुशिल बेल्हेकर, सहा.गटविकास अधिकारी श्री. पिसे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपनिबंधक एस.एम.तांदळे, पोलीस निरिक्षक अरुण पवार,धनजंय जाधव, मिलींद पाटील, उपकार्यकारी अभियंता डी.व्ही मुकडे , नगरपालिका आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी श्री.गुरव म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी तसेच सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने नागरिकांनी लसीकरण करु घेणे गरजेचे आहे. शासकीय कार्यालयात प्रवेश देताना दुसऱ्या डोसचे प्रमाणपत्र दाखवूनच प्रवेश द्यावा., गॅस वितरण , बँक, पेट्रोलपंप आदी ठिकाणी लसीकरण घेतल्याचा पुरावा असल्याशिवाय कोणताही लाभ दिला जाणार नाही. लसीकरणाचे प्रमाणपत्र असल्याशिवाय जमीन खरेदी-विक्रीचे दस्त होणार नाहीत यांची खबरदारी घ्यावी. पंचायत समिती, तहसिल कार्यालय, बाजार समिती आदी ठिकाणी गर्दी होत असल्याने लसीकरण प्रमाणपत्र तपासणीसाठी जादाचे कर्मचारी नेमावेत. प्रमाणपत्रा शिवाय कोणलाही प्रवेश देऊ नये. शिक्षण विभागाने तालुक्यातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे लसीकरण झाले का नाही खातरजमा करावी व त्याबाबत अहवाल सादर करावा. तसेच शालेय विद्यार्थ्यांना पालकाचे लसीकरण प्रमाणपत्र घेवून येण्यास सांगावे जेणे करुन लसीकरणाबाबत जागृती होईल. महाविद्यालयातील 18 वर्षापुढील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत महाविद्यालयात विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.असे आवाहनही श्री.गुरव यांनी केले आहे.
तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात 18 वर्षापुढील 3 लाख 6745 नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट असून आतापर्यंत 2 लाख 60 हजार 866 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 89 हजार 513 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.तसेच 2 लाख 17 हजार 232 नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतला नाही. तालुक्यातील गोपाळपूर, तपकीरी शेटफळ, देवडे, आंबे चिंचोली, फुल चिंचोली, विटे, सांगवी, तनाळी या आठ गावांत लसीकरण कमी प्रमाणात झाले असून, आरोग्य विभागाने संबधित गावचे 100 टक्के लसीकरणाबाबत नियोजन करावे. आवश्यकतेनुसार पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी यावेळी दिल्या.