सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्याच्या सभासदांनी राजकीय हेतूने केल्या जाणाऱ्या भुलथापांना बळी पडू नये. ज्या हेतुन कारखानदारी निर्माण केली तो हेतू समोर ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधील आहोत असे मत सिताराम महाराज साखर कारखान्याचे मा.कार्यकारी संचालक समाधान काळे यांनी व्यक्त केले.
सिताराम महाराज साखर कारखान्याच्या सभासदांकडून जमा केलेल्या शेअर्स रक्कमेबाबत स्वार्थी हेतूने काही लोक जनतेमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत आपण वेळोवेळी स्पष्टीकरण दिलेले आहे. आजही कंपनी नियमानुसार कारखान्याच्या भाग भांडवलाची रक्कम उपलब्धतेनूसार शेतकऱ्यांना देण्यासाठी आपण बांधील आहोत. यंदा पंढरपूर तालुक्यात निर्माण झालेल्या अतिरिक्त ऊसाच्या गाळपासाठी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याबरोबर सिताराम महाराज साखर कारखान्याचा मोठा हातभार लागला आहे. सहकारी साखर कारखानदारी अनंत अडचणींना तोंड देत असताना शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करुन कारखान्याच्या हिताला बादा आणुन नियमितपणे सुरु असलेल्या दोन्ही कारखान्यामध्ये विघ्न निर्माण करण्याचे काही लोकांकडून प्रयत्न केले जात आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचा पुतणा मावशीचा पुळका आणुन काही लोक आपणच शेतकऱ्यांचे तारणहार असल्याचा खोटा दिखावा करत आहेत. त्यांना यापुर्वी सभासद शेतकऱ्यांनी त्यांची जागा दाखविली आहे. निवडणुका डोळयासमोर ठेवून सुरु असलेल्या या प्रयत्नांना सभासद थारा देणार नाहीत. सिताराम महाराज साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांची ऊस बीलाची एफ.आर.पी.रक्कम आपण पुर्णपणे दिली असून भविष्यात शेतकऱ्यांच्या भाग भांडवलांची परतफेड त्यांच्या खातेवर जमा केली जाईल स.शि.वसंतदादा काळे, चेअरमन,कल्याणराव काळे यांनी शेतकऱ्यांचया विश्वासास कधीही तडा जावू दिला नाही तीच परंपरा भविष्यात जपला जाईल असा विश्वास समाधान काळे यांनी व्यक्त केला.