हसन मुश्रीफांनी अजुन एक गंभीर घोटाळा केला:सुनिल कदम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. सोमय्या यांनी मुश्रीफांविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांच्यावर अजून एक गंभीर आरोप करण्यात आलाय. हा आरोप किरीट सोमय्या नाही तर ताराराणी आघाडीचे नेते आणि माजी महापौर सुनील कदम यांनी केलाय. महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणात हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मदत केल्याचा आरोपही कदम यांनी केलाय.
हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्या मदतीने कोल्हापूर महानगरपालिकेची ड्रिम वर्ल्ड वॉटर पार्कमधील 15 गुंठे जमीन बेकायदेशीररित्या बळकावल्याचा आरोप सुनील कदम यांनी केला आहे. मुश्रीफ आणि पाटील यांनी राजकीय पदाचा गैरवावर करुन अधिकाऱ्यांवर दबाव आणत ही जमीन मुश्रीफ यांचे पुत्र साजिद मुश्रीफ यांच्या नावानं केली. त्यानंतर या जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प उभा केलाय. याच परिसरात अजून 33 गुंठे जमीनही आपल्याच नावावर करण्याचा साजिद मुश्रीफ यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही कदम यांनी केलाय.
मुश्रीफ यांनी बळकावलेल्या जागांची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. जिल्ह्यातील या दोन्ही मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही सुनील कदम यांनी सांगितलं आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्यासह आता सतेज पाटीलही अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आतापर्यंत दोन आरोप केले आहेत. यामध्ये पहिला आरोप म्हणजे कागलमधील सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याबाबतचा आहे. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांची पत्नी आणि मुलावर मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. बोगस कंपन्या दाखवून बेनामी संपत्ती जमवल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला. बाप बेटे दोघांच्या 127 कोटींचे पुरावे आमच्याकडे आहेत, असा पहिला आरोप सोमय्यांनी केला होता.
सोमय्यांनी दुसरा आरोपही साखर कारखान्याबाबत केला आहे. आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यातही बेनामी कंपन्यांद्वारे पैशांची अफरातफर केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. यामध्ये किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यासोबत त्यांच्या जावयाकडे बोट दाखवलं आहे.
सोमय्या यांनी मुश्रीफांवर घोटाळ्याचा तिसरा आरोपही केला आहे. हसन मुश्रीफ आणि जावई यांचा हा घोटाळा आहे. हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या ग्रामविकास खात्याचं टेंडर स्वत:च्या जावयाच्या कंपनीला कंत्राट दिलं, असा आरोप सोमय्यांनी केला. हा घोटाळा 1500 कोटी रुपयांचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. जी कंपनी अस्तित्वात नाही त्या कंपनीतून पैसे आले. ठाकरे सरकारच्या मंत्र्यामध्ये घोटाळा करण्याची कला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.