अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टी; अनेक गावांना पाण्याचा वेढा
सध्या मराठावाडा विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पाऊस सुरू असून अहमदनगर शहर तसेच जिल्ह्यातही संततधार सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून काल सायंकाळपासून पावसाला सुरवात झाली आणि रात्रभर पाऊस सुरूच होता. जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे आहे. पाथर्डी, शेवगाव, नेवासा, राहुरीचा काही भाग, नगर तालुका या भागात जास्त पाऊस झाला. अहमदनगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला देखील पूर आला आहे.
पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील डोंगरभागांत काल झालेल्या पावसामुळे शेवगाव तालुक्यातील नद्यांना पूर आला आहे. आखेगाव, खरडगाव, वरूर, भगूर, वडुले, ठाकूर पिंपळगाव या गावांत पूर स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील नंदिनी, चांदणी, वटफळी या तीनही नद्यांना पूर आला आहे. नदी पात्रापासून सुमारे पाऊण किलोमीटर अंतरापर्यंत पाण्याने शिरकाव केला आहे. या तीनही नद्यांचा संगम वरूर गावात होतो. तेथे तर हनुमान मंदिर, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असा गावाचा परिसरात नदीचे पाणी पोचले आहे. नद्यांना आलेल्या पूरामुळे पिके पाण्यात गेली असून नागरीकांचे जाव धोक्यात आले आहेत.
पावसाचे पाणी अचानक आल्याने नदीकाठचे आखेगाव येथील २५ कुटूंब तर वरूर येथील म्हस्के वस्तीवरील काही कुटुंबे पाण्यामध्ये अडकले आहेत. बऱ्याच जणांची जनावरे पाण्यात वाहून गेली असून नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांना वाचविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकड-पागिरे यांनी पैठण येथून बोट आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर ठाकुर पिंपळगाव येथील नदीच्या पुलावरून चाललेली ट्रक पाण्यात बंद पडली आहे. त्यात एक जण अडकला आहे. सर्व पिके पाण्यात गेली असून घरांचे ही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाने पिकांना आधार मिळाला आहे.