“संकट संपलेलं नाही”

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

“संकट संपलेलं नाही”

मुंबई:- पावसामुळे डोंगर कोसळणे, दरडी कोसळणे अशा घटना गेल्या पंधरवड्यात महाराष्ट्राच्या कोकणात तसेच काही शहरांमध्ये घडल्या आहेत. जवळपास 150 बळी पावसाने घेतले. यात वेगवेगळे अपघात आहेतच. निसर्गाचा प्रकोप नवीन नाही. पावसामुळे पुराची स्थिती येते त्यात अनेक जण वाहून जातात. अनेकांचे संसार वाहून जातात. जिवंत असूनही अनेकांच्या जीवनात आयुष्यभर मरण यातना राहतील इतकं नुकसान आहे. कोकणामध्ये ज्या गावांमध्ये पाणी शिरलं तिथे काही लोक माती दरडीखाली सापडून मरण पावले. पण जिवंत आहेत त्यांच्याही यातना मृत्यू पेक्षा कमी नाहीत. या सर्वांच्या घरात शिरलेला चिखल राडा म्हणजे संसारात थेट मातीच कालवली गेली आहे. हा चिखल साफ करणं, इमारतीचं, घरांचे मोठे नुकसान झाले आहे ते घर पडून गेल्या पेक्षा अधिक आहे. डागडुजी, रंगरंगोटी सारकाही करावा लागणार आहे. इलेक्ट्रॉनिक साहित्य पाणी लागलं की नष्ट होतं. कपडे भिजले, अनेकांचे पैसे दागिने वाहून गेले. वाहनांमध्ये पाणी शिरलं त्याची स्वच्छता, दुरुस्ती हे सारे पाहता दुःखाचा डोंगर अंगावर कोसळणं काय असतं याची प्रचिती येईल. आपल्या पासून ही माणसं थोडी दूर आहेत पण आपण हे दुःख आपल्या वाट्याला आलं असतं तर! हा विचार करा म्हणजे गांभीर्य कळेल. अहो सारं काही चिखलमय झालं आहे. दुरुस्ती केव्हा करणार त्याच्यासाठी पैसे आणायचे कुठून? माणूस श्रम एक वेळ करू शकू पण प्रत्येक बाबीला पैसे तर लागणारच. अनेकां समोर आता पुढे काय? हा प्रश्न कायम आहेच. आपलं गांभीर्य कुठपर्यंत असतं जोपर्यंत प्रसारमाध्यमात याविषयीच्या बातम्या सुरु आहेत तोपर्यंत. वेगळ्या बातम्या आल्या की मग प्रसारमाध्यमेही अशा गंभीर घटना विसरतात, दुर्लक्ष करतात पण यामुळे तेथील जनतेला झालेल्या समस्या संपल्या असतील असे नव्हे. मंत्र्यांचे दौरे झाले, आश्वासनांची खैरात झाली पण हे सारं प्रत्यक्षात येईल तेव्हाच. कोकणातील माणूस हिंमतवान तो पुन्हा उभारी घेईल वगैरे बोलायला ठीक आहे पण ज्यांच्यावर हिम्मत दाखवण्याची वेळ आली आहे त्यांनी पैशासह सर्व अवसान आणायचे कुठून? हा प्रश्न आहेच. सरकारवर रोज नवीन संकटं. सरकारी यंत्रणेने शक्य ती सार्वजनिक मदत करणं गरजेचं आहे. सध्या प्रत्येकांना आधाराची गरज असते. माणूस गप्प बसणार नाही तो पुन्हा उभारी घेणारच. पण हाच कालावधी असतो जिथे मनोधैर्य वाढवायची गरज असते. सारं काही सरकारने करावं या मानसिकतेत लोकांनी, स्वयंसेवी संघटनांनी बसू नये. आपणही काही हातभार लावला पाहिजे. आपण जयंत्या-पुण्यतिथ्या मेळावे याच्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च करतो. देणग्या देतो, वर्गणी देतो गेली दोन वर्षे हे सारं बंद आहे. तर मग ज्यांची स्थिती चांगली आहे त्यांनी हेच पैसे यावर्षी अशा संकटग्रस्तांसाठी मदत म्हणून पाठवले तर? निश्चित तुटपुंजी मदत असेल पण ती वेळेवर मिळाली तर यातून पुन्हा उभारी घेण्याची ताकद, अवसान या लोकांमध्ये येणार आहे. आपण त्यांना देतो आहोत म्हणजे ती भिक किंवा उपकाराची भावना ठेवू नये. तसेच मदत घेणार्‍यांनाही कमीपणा मानू नये. आज कोकणावर संकट आहे, उद्या निसर्ग इतर भागालाही अन्य संकटांनी अडचणीत आणू शकेल. कारण हे सारं कालचक्र आहे. निसर्गाने मानवाला हैरण करण्याची आजवर एकही संधी सोडली नाही. पुढेही तो सोडेल असं नाही. तळीये, महाड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा हल्ली कोल्हापूर-सांगली इथे वारंवार महापुराचे संकट येत आहे, येत राहणार. वारंवार एखादी घटना होत असेल तर त्यावर कायमस्वरूपी उपाय झाले पाहिजेत. सरकार करेल तेव्हा करेल पण आता आपण किती अडचणीत किती संकटाच्या डोंगराखाली राहायचं हा विचार करण्याची हीच वेळ आहे.

लक्ष्मण राजे- मुंबई

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here