२०१९ विधानसभेच्या उमेदवारांनी “त्या” पत्रातून केला गौफ्यस्फोट
शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीचे ग्रहण नाही सुटले तर स्थानिक व नागरी स्वराज्य संस्था हातून निसटण्याची व्यक्त केली शक्यता शिवसैनिकांनी
जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या मित्रधर्माला राष्ट्रवादीकडून वाटाण्याच्या अक्षता
शिवसेनेच्या माजी उमेदवारांनी मागितली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सक्षमपणे राज्याचा गाडा उत्तमरीत्या हाकत आहेत. मात्र एकीकडे राज्यात शिवसेनेची घोडदौड सूरु असतानाच सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेला मात्र अंतर्गत गटबाजीचे ग्रहण लागले असून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना न्याय मिळत नसल्याची चर्चा जिल्ह्याच्या वर्तुळातून रंगत आहे. २००४ साली सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे चार आमदार होते मात्र जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नामुष्कीमुळे २०१९ च्या विधानसभेत चार आमदारांचा एकच आमदार राहिला आहे.भविष्यात पक्षनेतृत्वाने जर दुर्लक्ष केले तर एकाची देखील पडझड होऊन शिवसेना शून्य व्हायला वेळ लागणार अशी चिंता निष्ठावंत शिवसैनिकंनी केली व्यक्त. जर अशाच पद्धतीने पदाधिकाऱ्यांचे काम चालले तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाची स्थिती फार बिकट होईल असा सनसनाटी आरोप २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांनी केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या शिवसेनेमधील वाढत्या खदखदीला मोहोळमधील उमेदवार नागनाथ भाऊ क्षीरसागर यांच्या वतीने सोमेश क्षीरसागर, माजी आमदार नारायण आबा पाटील आणि माढ्याचे उमेदवार संजय बाबा कोकाटे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांना पत्र लिहून मोकळी वाट करून दिली. या पत्रामध्ये असा आरोप केला आहे की, सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे जुने पदाधिकारी गेल्या अनेक वर्षापासून पक्ष संघटना वाढवण्यामध्ये कमी पडलेले आहेत. यांच्या नेतृत्वाखाली आगामी महानगरपालिका ,नगरपरिषद व तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जिंकू शकत नाही मात्र आम्हाला कुठल्याही गटबाजी मध्ये पडायचे नसून आम्हाला येणार्या विधानसभा व लोकसभा निवडणुका लढवून जिंकायच्या आहेत. त्यासाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका जिंकणे गरजेचे आहे व त्याकरिता सध्याच्या पक्ष संघटनेमध्ये खूप मोठे बदल करणे गरजेचे आहे त्यामुळे ज्यांना निवडणुकीला सामोरे जायचे आहे अशाच लोकांना पक्ष संघटनेमध्ये स्थान दिले तर तसेच दर तीन वर्षाला पक्षांतर्गत निवडणुका घेऊन पदाधिकारी नेमावे त्याचा पक्षवाढीसाठी त्याचा खूप मोठा फायदा होणार असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे पत्र संशयास्पदरीत्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्या पत्राची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे.कोणत्याही शासकीय कामात आम्हाला सहभागी करून घेतले जात नाही.जिल्हाधिकारी हे राष्ट्रवादी एके राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी सांगतील ती कामे करीत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मतदारसंघात आघाडीच्या घटकपक्षांसोबतचा अपवाद वगळता इतर सर्वांशी संबंध चांगले आहेत.माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे
त्यांच्या मतदारसंघातून विकासकामे वैयक्तिक पातळीवर आणल्याचे सांगतात तर दुसरीकडे मोहोळचे आमदार यशवंत माने राष्ट्रवादीच्या माध्यमातून व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून कोट्यवधी रूपयांच्या विकासकामांची उदघाटन करीत सुटले आहेत तर मग मुख्यमंत्री केवळ नामधारीच आहेत का…? महाविकास आघाडी केवळ नावापूरतीच आहे का..?मित्रपक्षांना वाऱ्यावरच सोडायचे की सोबत घ्यायचे….?असे विविध प्रश्न निर्माण होत असून शिवसेनेची अंतर्गत गटबाजी व मित्रपक्षांकडून श्रेय लाटण्याच्या भूमिकेमुळे शिवसेना गाळाच्या गर्तेत रुतत असल्याचे राजकीय विश्लेषकांतून मत व्यक्त केले जात असून हा सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांना व शिवसेना पक्षश्रेष्ठींना आगामी सर्व येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सर्व बाबीचा विचार करावा लागणार आहे अशी निष्ठावंत शिवसैनिकातून इच्छा व्यक्त होत आहे
————————————————————
शिवसेनेच्या जिल्हापदाधिकाऱ्यांनी व पक्षश्रेष्ठींनी आत्मचिंतन करावे
२००४ साली शिवसेनेचे चार आमदार निवडून आले त्यातील एक आमदार पोटनिवडणुकीमध्ये निवडून आले होते. त्यानंतर २००९ च्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातून एकही सेनेचा आमदार निवडून आला नाही व २०१४ मध्ये केवळ एकच शिवसेनेचा आमदार नारायण आबा पाटील हे करमाळ्यातून निवडून आले.शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेली तीन पंचवार्षिकच्या टर्मला काय केले…? असा यक्षप्रश्न सेनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर असून एकाही पदाधिकाऱ्यांकडे याचे उत्तर नाही हे विशेष . २०१९ ला त्यापैकी केवळ एकच आमदार उरला असून जर शिवसेनेच्या महत्वाची पदे धारण केलेल्या पदाधिकाऱ्यांनी असाच वेळकाढू पणाचा अवलंब केला व पक्षश्रेष्ठींनी मागील तीन पंचवार्षिक टर्मचा अभ्यास करून जर याकडे दुर्लक्ष केले तर एकाचा शून्य व्हायला वेळ लागणार नाही.त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी व पक्षश्रेष्ठींनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
———————————————————————
महाविकास आघाडीची कामे राष्ट्रवादीने स्वतःच्या नावावर खपवली
महाविकास आघाडीच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व आमदार सर्वच कामे आम्हीच करून दाखविल्याचा अविर्भाव आणत आहेत त्यामध्येच नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. सत्तेतील मित्रपक्ष असणारा राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या कामाचे श्रेय स्वतःच लाटत असून कोणत्याही शासकीय कामात शिवसेनेला सहभागी करून घेतले जात नाही.जर हे असेच चालू राहिले तर शिवसैनिक निष्क्रिय असल्याचे सिद्ध होऊन त्याचा फटका शिवसेनेला येत्या नगरपालिका ,महानगरपालिका तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला बसणार असल्याची सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे.