भोसे (क), ता. ६ : सर्व सामान्य शेतकऱ्यांना, कामगारांना त्यांच्या घामाचा दाम मिळाला पाहिजे, विठ्ठलच्या सभासदांवर आज आलेली ही वेळ भविष्यात येवू नये यासाठी आमचा लढा सुरु आहे. याउपरही आमच्यावर कोणी वारसदार असल्याचा आरोप करीत असतील तर त्यांना ठणकावून सांगतोय होय आहेच आम्ही वारसदार… म्हणूनच कारखान्याचं धुराड पेटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा विठ्ठल परिवाराचे नेते गणेश पाटील यांनी भोसे (ता. पंढरपूर) येथे विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय बैठकीत केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील होते. यावेळी ज्ञानदेव कोरके, तात्यासो पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, दिलीप रणदिवे, रामदास चव्हाण, प्रदीप पाटील, महिपती खरात, सर्जेराव दगडे, नामदेव मुळे, जीवराज चव्हाण, रामहरी चिखलकर, मोहन वगरे, चंद्रकांत महाडिक आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना गणेश पाटील म्हणाले, विठ्ठल परिवार एकसंघ राहावा ही आमचीपण प्रामाणिक भूमिका आहे त्यासाठी आमच्या सभासदांना आत्मसन्मान मिळाला पाहिजे. येत्या दोन ते तीन दिवसात आमची भूमिका स्पष्ट करू असे सांगून सभासद शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी जागरूक राहिले पाहिजे असे सांगितले.
यावेळी विठ्ठलचे संचालक युवराज पाटील म्हणाले, चेअरमनपदासाठी नाही तर कारखाना मूळपदावर आणण्यासाठी धडपड सुरु आहे. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी अगोदर आरोप सिद्ध करावेत, आपण घरी बसण्यास तयार आहोत असे सांगून कै. औदुंबर अण्णा यांच्या विचाराला कधीही गालबोट लागू देणार नाही. त्यासाठी सभासदांनी आम्हाला साथ दिली पाहिजे आम्ही विठ्ठल कारखान्यातून पुन्हा सोन्याचा धूर काढू आणि गतवैभव आणू असे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष दीपक पवार यांनी कारखाना सभासदांच्या मालकीचा रहावा यासाठी हा लढा असून अर्ज भरण्यापासून कारखाना सुरू करण्यापर्यंत व सभासद शेतकऱ्यांची देणी देण्यापर्यंतची सर्व तयारी झाली आहे आता फक्त तुमची साथ पाहिजे असे सागितले.
यावेळी दत्तात्रय बागल, चंद्रकांत जाधव, रावसाहेब चव्हाण, सागर यादव, प्रवीण भोसले, आनंद पाटील गुरसाळे, धोंडीराम पाटील, जितेंद्र भोसले, आनंद पाटील, संजय चव्हाण, धनाजी नागणे, औदुंबर शिंदे नारायण जाधव (संचालक विठ्ठल कारखाना), रामभाऊ भुसनर, जयंत भंडारे (प्रदेश चिटणीस राष्ट्रवादी), बाळासाहेब पाटील आदींनी कारखान्याच्या सद्यस्थितीवरती भाष्य केले.
यावेळी रोपळे, मेंढापूर, करकंब, खेडभोसे, होळे, नेमतवाडी, उंबरे, जळोली, कान्हापूरी, पांढरेवाडी, पटवर्धन कुरोली, पेहे, देवडे, शेवते आदि. ठिकाणचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वनाथ भिंगारे यांनी केले, सूत्रसंचालन गणेश आवताडे यांनी तर आभार माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात यांनी केले.