साखर पोती विकून नव्हे तर मग शेतकऱ्यांचे पैसे नेमके कशातून द्यावे?भीमा बचावला विश्रांतीची गरज!:प्रा.संग्राम चव्हाण
आर आर सी निर्देशानुसार गोडाऊनमधील सुमारे कोट्यवधी रुपयांच्या शिल्लक साखरेतील काही साखरपोती विकून भीमा कारखान्याच्या शेतकरी सभासदांची थकित ऊस बिले प्राधान्याने देण्याची प्रक्रिया मा.तहसिलदार मोहोळ यांचे निगराणीखाली गोडाऊनचे सिल ऊघडल्यानंतर भीमा कारखाना प्रशासनाने सुरू केली. टाकळी सिकंदर व सुस्ते गटाची बिले त्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा सुद्धा झाली.परंतु नकारात्मक प्रवृत्तीने भरलेल्या व सत्तेच्या दिवास्वप्नाने पछाडलेल्या भीमा बचाव समितीने आधी एफआरपी नुसार ऊस बिले द्या मगच गोडाऊन मधील साखरपोती विका असा एक नवा जावईशोध लावला अन्यथा आम्ही जिल्हा प्रशासनाला विरुद्ध उच्च न्यायालयात जाऊ अशी तक्रार जिल्हा प्रशासनाकडे केली. परिणामी शेतकऱ्यांची ऊस बिले वाटपाची प्रक्रिया ठप्प झाली. ज्यांची ऊस बिले जमा झाली नाहीत असे शेतकरी भीमा बचाव समितीवर संतप्त झाले. बचाव समितीच्या सदस्यांचा अपुरा अनुभव, अपूर्ण शिक्षण,अर्धवट ज्ञान,आडमुठेपणाची व मागासलेली विचारसरणी,संकुचित दृष्टिकोन यामुळे
भिमाच्या सभासदांची व प्रशासनाची कोंडी झाली व सभासदांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले द्यावी ही बचाव समितीची प्रमुख मागणी पूर्ण होत असताना त्यांनी असा अडथळा का निर्माण केला?मग आता सभासद हिताचा मुद्दा कुठं गेला? शेतकऱ्यांकडून ऊस हा कच्चामाल घेतल्यानंतर त्याचे पक्क्या मालात म्हणजे साखरेत रूपांतर झाल्यानंतर ही साखर विकूनच कारखान्याला पैसे मिळू शकतात व त्यातूनच शेतकऱ्यांची ऊस बिले दिली जातात. मग साखर पोती विकून नव्हे तर नेमके कशातून शेतकऱ्यांची ऊस बिले द्यावी? हे बचाव समितीने सांगावे. आता बचाव समितीची प्रमुख मागणी पूर्ण झाली असून आता हि अडवणूक नेमकी कशासाठी? कामगारांचे थकीत पगार लवकरच दिले जातील.विस्तारीकरण व विद्युत प्रकल्प ही शंभर टक्के पूर्ण झाले आहेत. भीमा कारखाना कुठल्याही पुरात बुडायला लागला नसून आता आगामी हंगाम यशस्वी करण्यासाठी सभासदांसह सर्वचजण प्रयत्नशील आहेत. बचाव समितीचा ‘खोट्या पुळक्याचा’ मुखवटा गळून पडला असून सत्तास्वार्थाचा ‘खरा’ चेहरा ह्या घटनेमुळे पुढे आला आहे. मानसिक ताणामुळे समिती विसंगत बडबड व कृती करत असल्याने समिती सदस्यांना विश्रांती ची गरज असून व आता ‘कामच’ संपल्यामुळे बचाव समिती विसर्जित करावी व आपला बाढबिस्तारा गुंडाळून थोडीशी विश्रांती घ्यावी, कुटुंबाकडे लक्ष द्यावे, आपापल्या शेतीवाडीकडे लक्ष द्यावे. कारखाना प्रशासनालाही त्यांचे दैनंदिन कामकाज करू द्यावे.अशी मल्लीनाथी भीमा परिवाराचे संघटक समन्वयक प्रा.संग्रामदादा चव्हाण यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना केली.यावेळी कारखान्याचे सर्व संचालक व भीमा परिवाराची सर्व प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती.