सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
शेतकरी व सामान्य नागरिकांचे फेरफार व जमीन विषयक कामे कुठल्याही सबळ कारणाशिवाय प्रलबिंत राहणार नाहीत याची दक्षता घेवून जमीनी विषयक तक्रारी व प्रश्न तलाठी कार्यालयामार्फत स्थानिक ठिकाणीच तातडीने सोडवावेत असे, निर्देश जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी मौजे शेवते (ता.पंढरपूर) येथील तलाठी कार्यालयास भेट देवून पाहणी केली. यावेळी सरपंच सुरेखा तुपसुंदर, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, उपसरपंच बबलु नेवतकर, पोलीस पाटील रामकृष्ण हेगडे, विठ्ठल सह.सा.कारखान्याचे सदस्य दशरथ खळगे, मंडल अधिकारी रणजीत मोरे, तलाठी निलेश कुभांर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी तलाठी कार्यालयाच्या दप्तराची पाहणी केली. तसेच संगणीकृत सात-बारा उतारे, विविध गांव नमुने, प्रलंबित फेरफार, ई-पिक पाहणी नोंदणी आदी बाबींची पाहणी करुन आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच ई पिक पाहणी नोंदीमुळे शेतकऱ्यांना विविध सुविधा व योजनांचा लाभ घेणे शक्य होणार असल्याने शेतकऱ्यांनी स्वता: ई-पीक पहाणी नोंदणी करुन घ्यावी. ज्या शेतकऱ्यांना नोंदणी करता येत नाही अशा शेतकऱ्यांना मदत करुन जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करावी असे, आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी केले.तसेच मौजे शेवते तलाठी कार्यालयाच्या कामकाजाबाबत समाधानही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
गावांतील नागरिकांचे व 15 ते 18 वयोगटातील मुलांचे 100 टक्के लसीकरण करुन घ्यावे असे आवाहनही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी केले.