जिल्ह्यात तापमान वाढत असून उन्हाळ्याचे दिवस असल्याने वन्यप्राणी व पक्षी पाण्याच्या आणि निवाऱ्याच्या शोधात असतात. यादरम्यान रस्ता ओलांडताना अपघात होतो, काही वन्यप्राणी विहिरीत पडतात. अशावेळी त्यांना मदत मिळाली नाहीतर वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागतो. घडलेल्या घटनेची माहिती ठिकाणासह वन विङागाला 1926 या टोलफ्री क्रमांकावर देण्याचे आवाहन वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी केले आहे.
सद्यस्थितीत जंगलाचे प्रमाण कमी झाल्याने वन्यप्राणी मनुष्य वस्तीत आढळून येत आहेत. पाणी,निवारा किंवा अन्नाच्या शोधात स्थलांतर करताना अपघात होतो किंवा वन्यप्राणी विहीरीत पडतात. अशा घटनांची माहिती वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ वर दिल्यास घटनास्थळी रेस्क्यू टीम पोहोचून वन्यप्राण्यांचा जीव वाचविणे शक्य होईल.
सामान्य नागरिक, शेतकरी यांनी शेतात किंवा घराच्या आवारात छोटे दगड, बोट, मातीचा वापर करून छोटे
आकाराचे पाणवठे तयार करावेत. यामुळे वन्यप्राणी, पक्षी यांना पाणी पिण्याची सोय होईल. तसेच घराच्या गच्चीवर किंवा परसबागेत पक्ष्यांसाठी धान्य ठेवावे. पाणी पिण्यासाठी कुंडे ठेवावेत, जेणेकरून पक्ष्यांना पाणी पिण्याची सोय होईल, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.