पशुधनाला होणाऱ्या लम्पी चर्म रोगाने बाधित जनावरांची संख्या कमी होत असल्याचे चित्र असल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. याचबरोबर गाय, बैल, वासरे अशा एकूण 3 हजार 191 मृत पशुधनापोटी पशुपालकांना एकूण 7 कोटी 60 लाख 6 हजार रूपये अनुदान वितरीत केल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भास्कर पराडे यांनी दिली.
डॉ. भास्कर पराडे म्हणाले, लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. माश्या आणि डासांच्या विशिष्ट प्रजाती तसेच उवांमुळे हा रोग पसरतो. यामुळे ताप येणे, त्वचेवर गाठी येणे अशी लक्षणे दिसून प्राण्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. यावर पशुसंवर्धन विभागाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. पशुपालकांनी घाबरून जावू नये, यासाठी टोल फ्री क्रमांकावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, जिल्ह्यात जनावरांचे 100 टक्के लसीकरण करण्यात आले. यासाठी जिल्ह्यात 198 इपिसेंटर उभारण्यात आले. 8 हजार 873 बाधित गोठे फवारणी करण्यात आले. या सर्व उपाययोजनांमुळे जिल्ह्यात लंपी चर्मरोगाने बाधित पशुधनाची संख्या आटोक्यात आली असून, आजरोजीला जिल्ह्यात केवळ 501 पशुधन या रोगाने बाधित आहे.
डॉ. भास्कर पराडे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात 33 हजार 527 गायी, 5 हजार 391 बैल असे एकूण 38 हजार 918 पशुधन लंपी चर्मरोगाने बाधित झाले होते. पैकी 29 हजार 955 गायी, 4 हजार 852 बैल असे एकूण 34 हजार 807 पशुधन उपचाराने बरे झाले. तर 1 हजार 979 गायी, 219 बैल व 1 हजार 413 वासरे मृत्युमुखी पडली. त्यांच्या पशुपालकांना एकूण 7 कोटी 60 लाख 6 हजार रूपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे.