पंढरपूर–‘तावशीमध्ये संस्कार शिबिरात श्रम करताना स्वेरीतील विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे संस्कार मिळाले, संस्कार घेता घेता विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांचे प्रेम देखील मिळवले. विद्यार्थ्यांना हेच संस्कार भविष्यात आयुष्याची शिदोरी म्हणून उपयोगी पडतात. त्यामुळे समाजासाठी आपल्याकडून दिले जाणारे योगदान महत्वाचे ठरते. ‘भारत’ आणि ‘इंडिया’ यातील फरक समजून घेताना याच संस्कारांचा फायदा होतो. विद्यार्थ्यांना या शिबिरातून आत्मविश्वास आणि धाडस मिळते. विद्यार्थ्यांनी या आत्मविश्वासाचा आणि धाडसाचा वापर समाजाच्या हिताच्या व विकासाच्या दृष्टीने करावा. विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली पाहिजे. कष्टावर विश्वास ठेवला तर इच्छित प्रगती साध्य होत असते. त्यामुळे आपल्या कामात ‘स्मार्ट वर्क’ पेक्षा ‘हार्ड वर्क’ वर अधिक विश्वास ठेवा. कारण ‘हार्ड वर्क’ करत करत पुढे ‘स्मार्ट वर्क’ मध्ये रुपांतर होत असते. म्हणून प्रत्येकाने भविष्यात आपल्या कामावर प्रेम करून वाटचाल करावी. एकूणच रासेयोच्या माध्यमातून परिपूर्ण विद्यार्थी घडतो.’ असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्या संयुक्त विद्यमाने तावशी (ता. पंढरपुर) मध्ये दि.१४ मार्च २०२२ ते २० मार्च २०२२ या कालावधीत राष्ट्रीय सेवायोजने अंतर्गत ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोप प्रसंगी स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे हे मार्गदर्शन करत होते. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश मठपती यांनी आठवडाभर चाललेल्या ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’ची सविस्तर माहिती, ग्रामस्थांनी केलेले सहकार्य आणि केलेले उपक्रम याबाबत सविस्तर विवेचन केले. या शिबिरात सकाळी ९ पासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सूर्यनमस्कार पासून विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमापर्यंत असे अनेक उपक्रम राबविले. यावेळी विद्यार्थी अक्षय माने, अक्षता कुंभार, दिप्ती कदम, दिग्विजय खलाटे, खंडेराया केरकल यांनी मनोगतातून या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थांनी उत्तम सहकार्य केल्याचे सांगितले. तसेच या शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास हातभार लागल्याचे सांगितले. यावेळी ‘माझी वसुंधरा’ या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांकडून तावशी गावात विविध ठिकाणी १०१ देशी वृक्ष लागवड करून पर्यावरण संरक्षणा बरोबरच जलसंधारणाचे महत्व आणि मतदार जनजागृती करण्यात आली. तावशीतील साधना विद्यामंदिर व जि.प. शाळा येथील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती देखील देण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता एम.एम. सुरकुटवार, ग्रामसेविका ज्योती पाटील, तावशीचे सरपंच गणपत यादव, उपसरपंच अमोल कुंभार, जय मल्हार शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुभाष यादव, सचिव बाळासाहेब (काका) यादव, जिल्हापरिषद शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल शिखरे, मार्केट कमिटीचे संचालक धनाजी यादव, माजी उपसरपंच संजय यादव, पांडुरंग आसबे, सदस्य विठ्ठल पिसे, रासेयोचे सह समन्वयक प्रा. सुभाष जाधव, प्रा.करण पाटील, अभियांत्रिकीतील रासेयोचे सत्तरहून अधिक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. स्वेरीचे रासेयोचे सल्लागार डॉ. आर.एन. हरिदास, प्रा. एस. आर. गवळी, प्रा. के. एस. पुकाळे, प्रा. ए. एम. कस्तुरे, प्रा. टी.एस जोशी, प्रा. ए.एस. जाधव, प्रा. जी.जी. फलमारी, प्रा. एस.बी. खडके, प्रा. टी.डी. गोडसे, प्रा.व्ही.व्ही.झांबरे, प्रा.ए.एस. जाधव, प्रा.पी.बी. आसबे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर तावशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्रा. आर. एम. आसबे यांनी आभार मानले. निरोप घेत असताना विद्यार्थ्यांबरोबरच तावशी ग्रामस्थ सुद्धा भावूक झाले होते.