रब्बीसाठी उजनी धरणातून एक आवर्तन सोडण्यास मान्यता

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

सोलापूर,दि.21: जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी एक आवर्तन सोडण्यास मान्यता देण्यात आली असून 28 जानेवारी 2022 पाणी सोडण्यात येणार आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

            बैठक गुगल मीट ॲपद्वारे ऑनलाईन घेण्यात आली. बैठकीला आमदार सर्वश्री बबनराव शिंदे, संजय शिंदे, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह.तु. धुमाळ, अधीक्षक अभियंता आणि प्रशासक डी.बी. साळे, उजनी धरण व्यवस्थापकचे कार्यकारी अभियंता आर.पी. मोरे, भीमा विकास विभागचे कार्यकारी अभियंता आर.एन. क्षीरसागर यांच्यासह पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील कालवा सल्लागार समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री. भरणे यांनी सर्व लोकप्रतिनिधींच्या समस्या, मागण्या ऐकून घेतल्या. श्री. भरणे यांनी सांगितले की, 28 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत डावा आणि उजव्या कालव्यातून पाच टीएमसी तर भीमा-सीना जोड कालव्यातून दीड टीएमसी पाणी सोडण्यास मान्यता देण्यात आली. दहिगाव उपसा सिंचनसाठी 2 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत 0.15 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. आमदार बबनराव शिंदे यांनी सीना-माढा प्रकल्पाला मार्चच्या पुढे पाणी सोडण्यास सांगितल्याने त्याला मान्यता देण्यात आली आहे. 

रब्बी हंगामात गाळ वजा जाता एकूण पाणीसाठा 120.34 टीएमसी तर उपयुक्त 56.68 टीएमसी साठा आहे. याची टक्केवारी 85.06 इतकी आहे. पहिल्या आवर्तनात 6.65 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. यामध्ये सीना-माढा प्रकल्पाला मार्चनंतर पाणी सोडण्यात येणार आहे.

            बैठकीत उन्हाळ हंगामाचेही नियोजन करण्यात आले. उन्हाळ हंगामासाठी दोन आवर्तन असून यामध्ये पहिल्या आवर्तनामध्ये 16.90 टीएमसी तर दुसऱ्या आवर्तनात 17.90 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. यामध्ये कालवा, नदी, जोडकालवा, उपसा सिंचन योजनांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली. 

शिवाय भीमा नदीला मागणी, परिस्थिती, पाणी साठ्याच्या उपलब्धेनुसार 25 फेब्रुवारी 2022 नंतर पाणी सोडण्यात येणार आहे. उजनी धरणात मार्चअखेर गाळ वजा जाता संभाव्य उपयुक्त पाणीसाठा 106.74 टीएमसी आहे. पाणी नियोजनाचे सादरीकरण श्री. साळे यांनी केले.

1 मार्च 2022 अखेर संभाव्य पाणी वापर

बाष्पीभवन-पाच टीएमसी

जलाशय उपसा सिंचन-4.50 टीएमसी

जलाशय बिगर सिंचन (पिण्यासाठी)-0.85 टीएमसी

जलाशय बिगर सिंचन (औद्योगिक)-0.55 टीएमसी

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here