मोहोळ मतदारसंघातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमेश (आबा) शिरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांची भेट
(सर्व मागण्या लवकरच पूर्ण करू मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन)
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उजनीच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या उर्वरित गावांना पाण्याचा लाभ द्यावा, नदीवरील बंधाऱ्यांची गळती थांबवून ते पूर्ण क्षमतेने बंधारे भरून घ्यावेत, युती शासनातील काळातील रखडलेल्या उपसा सिंचन योजना पूर्ण कराव्यात, मतदार संघातील सर्व रस्ते खड्डे मुक्त करावेत, मोहोळ येथे अद्यावत उपजिल्हा रुग्णालय व्हावे, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना मधून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांना निधी मिळावा यासह तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवावेत, या मागण्यांसाठी शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली.
मोहोळ मतदारसंघातील प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार नारायण पाटील, माढ्याचे संजय कोकाटे व शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे भेट घेतली.
यावेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित असलेल्या मागण्या सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली असून यामध्ये युती शासनाच्या काळात मंजूर झालेल्या व स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न असलेल्या आष्टी व शिरापूर सिंचन योजना अद्यापही रखडलेल्या आहेत, यासह पर्यावरण मंत्री युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेली आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक- २ पोखरापूर तलावात पाणी सोडण्याची योजना पूर्ण करण्याचे उचित आदेश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना व्हावेत. यासह भीमा – सीना जोड कालवा प्रकल्पाच्या धर्तीवर मोहोळ तालुक्यातील सिना- भोगावती जोड कालवा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद करावी, मोहोळ तालुक्यातील अनेक भाग उजनीच्या पाण्यापासून वंचित असून त्या भागाला पाणी मिळण्यासाठी सर्वे चे आदेश देऊन पाणी देण्याची व्यवस्था शेतकऱ्यांना करावी. तसेच मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायतीची बांधकामे जुनी झाली आहेत, त्यामुळे “स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना” मधून नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करण्यास निधी मिळावा.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील एकमेव असलेल्या जमीन खरेदी विक्री साठी असलेले दुय्यम निबंधक कार्यालय अपुरे पडत असून तालुक्यात कामती येथे आणखी एक जमीन खरेदी विक्री केंद्र मंजूर करावे, मोहोळ नगरपरिषद नव्याने स्थापन झाली असून शहरात वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. पर्यायाने तात्काळ अग्निशामक विभागाचा संपूर्ण निधीची तरतूद संबंधित विभागामार्फत करावी. शिवसेनेच्या ग्रामपंचायती असलेल्या गावांना विकास कामांसाठी वाढीव निधीची तरतूद करावी. राष्ट्रीय महामार्गांच्या धर्तीवर मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व रस्ते खड्डे मुक्त करावेत. या व तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणार असल्याचेही यावेळी शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर यांनी सांगितले.