सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच मोहोळ विधानसभा मतदारसंघावर बरेच वर्ष आमदारकीच्या माध्यमातून अधिराज्य गाजवलेले अनगरचे राजन (मालक) पाटील हे भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचे समजत असून त्यासाठी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र (भाई) फडणवीस हे प्रयत्नशील असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
काही महिन्यांपूर्वी माजी आमदार राजन पाटील हे भाजप मध्ये जाणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली होती त्यामुळे जिल्ह्यात व राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले अनेक वेळा त्यांनी तो विषय बोलणे टाळला परंतु जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसणार आहे मोहोळचे आ.राजन पाटील व त्यांचे दोन्ही चिरंजीव यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश निश्चित झाला असल्याचा दुजोरा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी दिला आहे.
सध्या जिल्हाध्यक्ष काका साठे हे द्विधा मनस्थितीत दिसत आहेत. राजन पाटील यांनी वरिष्ठ नेत्यांनाही थेट सांगून टाकले आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा उत्तर तालुक्याला जोडला गेला आहे. त्या मतदारसंघात उत्तरची तब्बल 24 गावे असल्याने काकांचे टेन्शन वाढले आहे. राजन पाटलांनी काका साठे यांना ही भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. आजपर्यंत दोघांनी मिळून सलग तीन वेळा मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला आहे.
एकमेकांच्या समन्वयाने हे यश मिळाले असे काका सांगतात. आता तेच पक्षात नसतील तर मला अवघड जाणार आहे. उमेश पाटलांना घेऊन काम करता येणार नाही का? असा प्रश्न पत्रकारांनी केला. ते कदापि शक्य नाही. त्यांच्यामुळे तर हे सर्व घडत असल्याचा आरोप काका साठे यांनी केला.
इडीची कारवाई नको म्हणून आणि आमदारकी यासाठी राजन मालक जात आहेत का? असाही प्रश्न उपस्थित केला असता अजिबात नाही. पक्षाचे त्यांच्याकडे झालेले दुर्लक्ष, उमेश पाटलांना कुणी थांबवेना, मी किती वेळा पक्षाच्या निदर्शनास आणून दिले त्याचा काही फायदा झाला नाही. असा नाराजीचा सूर काकांच्या तोंडून आला.
मी सध्या विचार करत आहे काय करावे, अडचणीत सापडलो आहे. असे ते म्हणताच तुम्ही ही भाजपात जाणार का? या प्रश्नावर नाही बाबा, मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच राहणार असे सांगून काकांनी सर्व चित्र स्पष्ट केलं.