(पाटील परिवाराने गोव्याचे मुख्यमंत्र्यी डाॅ.प्रमोद सावंत यांना घातली पुणेरी पगडी;सावंतांच्या भेटीनंतर राजन पाटलांचे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर)
संपुर्ण राज्यात शरदनिष्ठ अशी ओळख असलेले मोहोळचे माजी आमदार राजनजी पाटील यांच्या गेल्या काही महिन्यापासून भाजप प्रवेशाच्या बातम्या विविध माध्यमातून समोर येत आहेत.मागील दोन-तीन महिन्यापूर्वी दिल्ली येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट असो,पेनुरच्या कार्यक्रमात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी भाजपात येण्यासाठी केलेले खुले आव्हान असो अशा अनेक घटना गेल्या काही महिन्यांपासून मोहोळच्या पाटील घराण्याबद्दल घडत आहेत. परंतु प्रत्येक वेळी आपल्या चाणाक्ष राजकीय अनुभवाच्या आधारे राजनमालकांनी ही अफवा आहे असे सांगून या विषयावर पडदा टाकण्याचे प्रयत्न केले आहेत.त्यातच आज गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ.प्रमोद सावंत यांनी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर अनगर येथील राजनजी पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनीही राजनमालकांना भाजप मध्ये येण्याचे खुले आमंत्रण दिले.यानंतर मात्र पत्रकारांशी बोलताना माजी आमदार राजनजी पाटील यांनी ही भेट कौटुंबिक असल्याचा निर्वाळा दिला असून ते पुढे बोलताना म्हणाले की,माझ्या मतदार संघातील जनतेने गेली 50 वर्ष लोकनेते बाबुरावआण्णांचे व माझे नेतृत्व मान्य केले आहे त्यामुळे त्यांना विचारल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही.कारण सत्तेसाठी इतर कुठे ही जाणारा माणूस मी नाही,पाटील परिवारावर कितीही मोठी संकटे आली तरी आम्ही त्याला घाबरत नाही.आम्ही एकनिष्ठ माणसे आहोत असेही ते म्हणाले.