भीमा कारखाना हि कामगारांची लक्ष्मी!
बाहेरील हस्तक्षेप व कोरडी सहानुभूती नको
(बाबा गावडे,अध्यक्ष इंटक)
सोलापूर // प्रतिनिधी
भीमा कारखाना व कारखान्यातील काम ही कामगारांची लक्ष्मी आहे!आमची सर्वांची भाकरी आहे ! यंदाचा हंगाम तोंडावर आला असून कारखान्यातील तांत्रिक कामे युद्ध पातळीवर पूर्ण करून देणे हे आमचं कर्तव्य आहे. आमच्या कामावर 22 हजार सभासदांच्या चुली अवलंबून आहेत. तसेच संस्थेचे भवितव्य अवलंबून आहे याचे भान आम्हाला आहे. राजकारण काहीही असो कारखान्याच्या तांत्रिक कामांमध्ये राजकारण करणे योग्य नाही.काही महिन्यांचे वेतन थकले असले तरीही संचालक मंडळ व चेअरमन खासदार धनंजय महाडिक व प्रशासन योग्य दिशेने प्रयत्न करत असून कामगारांच्या थकीत वेतनाची पै अन् पै चेअरमन श्री.धनंजय महाडिक चुकती करतील यांवर माझा व माझ्या कामगार संघटनेचा पूर्ण विश्वास आहे. राजकारण काहीही असो आम्हा कामगारांना राजकारणाशी काहीही घेणे-देणे नाही.विविध कारणांमुळे सोलापूर जिल्हा व राज्यातील साखर उद्योग धोक्यात वा अडचणीत आला आहे हे एक भयानक वास्तव असून ही वेळ कामगारांनी संस्थेच्या अडचणी समजून घेण्याची आहे. म्हणून आम्ही काम न थांबवता कर्तव्यावर रुजू होत आहोत. चेअरमन धनंजय महाडिक यांनी आपले राजकीय वजन वापरून कामगारांचा प्रश्न त्वरित सोडवावा असे मी माझ्या संघटनेमार्फत आवाहन करतो. कामगार संघटनांनी त्यांच्या हक्कांसाठी जरूर लढलं पाहिजे परंतु सारासार विचार व सद्सद्विवेकबुद्धी सोडून देऊन नकारात्मक मानसिकता बाळगून प्रशासनाला वेठीला धरून चालू काम बंद ठेवून कोणताही मार्ग निघत नसतो.अशा पद्धतीने प्रशासनाला वेठीला धरून काम बंद ठेवून आंदोलनाचा पवित्रा घेणे हे संस्थेच्या व कामगारांच्या हिताचे असू शकत नाही. सर्व कामगारांनी एकजुटीने काम करण्याची ही वेळ आली असून या ठिकाणी राजकारणाला थारा देणे उचित नाही. मात्र आज या ठिकाणी काही कामगार नेते दबावाखाली जाऊन चुकीच्या राजकीय मंडळींच्या ओंजळीने पाणी पीत असून त्यांना कामगारांच्या हितामध्ये सुद्धा राजकारणच सुचत आहे.अशा काही कामगारांना यांना व्यक्तिगत हितसंबंध जोपासण्याचे व सवंग *प्रसिद्धीचे व पुढारपणाचे डोहाळे लागलेले दिसतात* अशा काही नादान मंडळींना कामगार हितापेक्षा स्व:प्रसिद्धी राजकिय लांगूलचालन जास्त महत्वाचे वाटत असून त्यांनी आपली योग्यता पात्रता वेळीच ओळखून वेळीच शहाणं व्हावं. त्यांच्या चुकीच्या, गैर,स्वकेंद्रित हट्टासाठी सर्व कामगारांना दूरगामी अनिष्ट परिणामांना सामोरे जावे लागू शकते.आतापर्यंत झाले एवढे नुकसान पुरे झाले.अशा व्यक्तींना किती महत्व द्यायचे हे सर्व कामगारांनी ठरविण्याची वेळ आली आहे.कामगार संघटना राजकारणात अडकल्या तर मोठमोठे ऊद्योग अडचणीत आलेली ऊदाहरणे आहेत. कामगारांचे हित एक व्यापक प्रक्रिया असून इथं व्यक्तिगत विचारांना किंमत नसते ही गोष्ट संबंधित कामगारांनी वेळीच लक्षात घ्यावी. कामगारांच्या थकीत वेतनाचा प्रश्न हा राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने फक्त आणि फक्त कारखान्याचे चेअरमन श्री.धनंजय महाडिकच सोडवु शकतात; अन्य कुठली बचाव समिती अथवा बाहेरील कुणी सोमे-गोमे मंडळींमध्ये हा प्रश्न सोडविण्याची कुवत असू शकत नाही हे स्फटिका इतके स्वच्छ असताना राजकीय स्वार्थाने पछाडलेल्या ह्या मंडळीं च्या नादाला लागून त्यांचे अकारण महत्त्व वाढू देऊ नका.त्यातून काहीही साध्य होणार नसून कामगारांना व सभासदांना फक्त कोरडी सहानुभूती दाखविण्या व चिथावणी देऊन कामगारांना भडकावण्याच्या पलीकडे ह्या मंडळींच्या हातात काहीही नाही.असे असताना आपण कामगारातील अशा “नासविणा-या” प्रवृत्तींना खड्या प्रमाणे बाजूला काढून पुढे मार्गक्रमण केले पाहिजे.
चौकट
बचावसमितीमुळेच पैशांची तरतूद लांबणीवर,
तडजोडीतच शहाणपण,
आपला प्रश्न खरंच कोण सोडवू शकतो?
थकित देयकाच्या मुद्द्यावर बचाव समितीची मंडळी त्यांची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न मात्र करत आहे हे स्पष्ट दिसतंय.ही गोष्ट आम्ही कारखान्याच्या सर्व कामगारांना पोटतिडकीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्हाला त्यात बऱ्यापैकी यश आले आहे. कामगारांच्या थकीत वेतन प्रश्नामधे ढवळाढवळ करून चालू प्रश्न जास्त गंभीर व जटिल करण्याचा प्रयत्न बचाव समितीने केला आहे. *राज्य सरकारकडे त्यांनी तक्रारी केल्या नसत्या तर आजपर्यंत सर्व कामगारांना त्यांचे संपूर्ण थकित वेतन अदा झाले असते.* सर्व कामगारांनी क्षणभर थांबून स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारण्याची आज वेळ आली आहे की आपला प्रश्न खरंच कोण सोडवू शकेल? बचाव समिती कि कारखान्याचे चेअरमन ? जर बचाव समितीला कामगारांच्या प्रश्नाबद्दल मनापासून तळमळ असली असती तर भीमा कारखान्याला राज्य सरकारकडून मिळणारी मदत रोखण्याचे दुष्कृत्य त्यांच्याकडून घडले नसते! आमच्या प्रश्नासाठी आम्ही लढण्यासाठी समर्थ आहोत.बाहेरील कोणीही कामगारांच्या प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करू नये असे इशारा भीमा सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ कामगार नेते तथा कामगार संघटनेचे सचिव श्री.महादेव(आबा) बाबर यांनीही याप्रसंगी केले.