पुणे येथे एमएससी बँक प्रतिनिधी आणि साखर व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये संचालक युवराज पाटील यांनी विठ्ठल कारखान्याला पैसे देऊ नये, दिल्यास कोर्टात जाण्याबाबत दमबाजी केल्यामुळेच साखरेची विक्री होऊ शकली नाही आणि सभासदांना पैसे मिळू शकले नाही, असा आरोप विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी केला.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने विठ्ठल शेतकरी विकास पॅनलची सभा आज खेडभोसे, देवडे, नांदोरे, पेहे, शेवते येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मनसे चे दिलीप धोत्रे, संचालक दशरथ खळगे, संचालक सूधाकर कवडे शालिवाहन कोळेकर, हणमंत पवार बंडू पवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. भालके म्हणाले की, मागील दीड वर्षाच्या काळात युवराज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सतत पायात पाय घालण्याची भूमिका बजावली. त्यांनी जीएसटी बाबत तक्रार केल्यामुळेच कारखान्याची बँक खाती लॉक झाली, परिणामी सभासदांना ऊसाचे बिल देऊ शकलो नाही, एप्रिल महिन्यात पुणे येथे झालेल्या बैठकीत बँकेचे प्रतिनिधी, साखरेचे व्यापारी कारखान्याला पैसे देण्यासाठी तयार होते, अठरा पैकी सतरा संचालकांनी त्या ठरावावर सह्या सुध्दा केल्या मात्र युवराज पाटलांनी सही केली नाही, तसेच त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना आणि साखर व्यापाऱ्यांना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला पैसे दिल्यास तुमची कोर्टात तक्रार करु, अशी धमकी दिली, त्यामुळेच कारखान्याला पैसे मिळू शकले नाहीत.
वसा आणि वारसा सांगत असताना मागील वीस वर्षांच्या काळात विरोधी पॅनेलचे नेते किती सभासदांच्या सुख दुःखात सहभागी झाले ? त्यांना साधे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावांची नावे सुध्दा माहीत नाहीत, अशी टीका केली.
अभिजित पाटील हे परिवारातील नसताना स्वतःच “मी परिवारातील असल्याचे” सांगत आहेत, त्यांचा आणि परिवाराचा काडीचाही संबंध नाही. आंबेचिंचोली ते शेळवे या नदी पट्ट्यातील भागातील गावात त्यांचा रक्तरंजित इतिहास माहिती आहे. 6 वर्षांपूर्वी शेळवे गावातील सुमारे 38 युवकांवरती केसेस केल्या आहेत, असा माणूस निवडून दिल्यास हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना कधी खासगी झाला हे सुध्दा कळणार नाही, असा आरोप केला.