टोमॅटोला 10 रु.प्रति किलोच्या खाली दर द्याल तर याद राखा.
-प्रा. संग्राम चव्हाण जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस
नैसर्गिक परिस्थिती अनुकूल राहील्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वत्र टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणावर आले असून टोमॅटोचे चार रुपये प्रति किलो एवढे कोसळले असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. टोमॅटोच्या शेकडो ट्रक ची आवक बाजारपेठेत होत असून व्यापारी या परिस्थितीचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. टोमॅटोचा एक एकराचा प्लॉट उभा करण्यासाठी जमीन मशागत,रोपे, बांबू व तार फाउंडेशन,सुतळी,बेसल खतांचा डोस व लिक्विड खते कीटकनाशके फवारणी मजूरी,तोडणी या सर्व बाबींवर एकत्रित मिळून खर्च सुमारे प्रती एकर 1 लाख 20 हजार एवढा होत असतो. तर उत्पादन चांगले झाले तर एका एकरामध्ये पंधरा टनापर्यंत टोमॅटो उत्पादित होतात म्हणजे प्रति किलो आठ रुपये एवढा खर्च शेतकऱ्यांना पिक आणण्यासाठी होतो. यानंतर वाहतुकीला दोन रुपये जातात म्हणजे टोमॅटो साठी दहा रुपये प्रति किलो हा हमीभाव गरजेचा आहे तरच शेतकऱ्यांची लुबाडणूक होणार नाही. व्यापाऱ्यांनी आवक जादा झाली म्हणून पाच रुपये एवढा दर देऊन शेतकऱ्यांची लूट करण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा. त्याला नफा मिळायचा तर दूर त्याचा त्याने केलेला खर्च ही निघेनासा झालेला आहे. या गोष्टीचा कुणीच विचार करताना दिसत नाही. व्यापाऱ्यांच्या हावरटपणा ला मर्यादा नसतात. पण हतबल शेतकऱ्यांची ही भर बाजारपेठेत होणारी लूट आम्ही होऊ देणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा ही लूट चाललेली आहे सर्व मार्केट कमिटीचे संचालक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी ही लूट उघड्या डोळ्यांनी बघत आहेत हे योग्य नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ व चेअरमन यांनी या परिस्थितीची गंभीर दखल घ्यावी व व्यापाऱ्यांना त्वरित तशा सूचना द्याव्यात ते त्यांचे कर्तव्य आहे.
तसेच टोमॅटो पिकणार्या भागात गावागावात उतरून काही व्यापारी जागेवर टोमॅटो खरेदी करत आहेत तेसुद्धा चार रुपये प्रति किलो दर देऊन शेतकऱ्याला लुटत आहेत. ही लूट थांबली नाही तर टोमॅटोचे सौदे बंद पाडण्यात येतील हि खरेदी कायदेशीर आहे का याची शहानिशा करावी लागेल व वेळ पडल्यास व्यापार्यांना घरचा रस्ता दाखवायला कमी करणार नाही. या परिस्थितीत सर्व व्यापाऱ्यांनी दखल घेऊन टोमॅटोला सद्यस्थितीला त्याचा उत्पादन खर्च निघण्यासाठी कमीत कमी प्रति किलो 10 रुपये दिला नाही तर याद राखा ! असा इशारा सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. संग्राम चव्हाण यांनी टाकळी सिकंदर येथे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला. यावेळी समाधान चव्हाण, करण डोंगरे ,संघर्ष डोंगरे, किसन गायकवाड ,धर्मा वसेकर, संदीप डोंगरे पप्पू डोंगरे इतर अनेक टोमॅटो उत्पादक शेतकरी उपस्थित होते.