चंद्रभागेच्या पात्रात वाळुचोरट्यांकडून अहोरात्र होत असलेल्या वाळु उपशामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यात बुडून अनेक वारकरी भाविकांचे बळी गेले आहेत. दि. 20 डिसेंबर 2022 रोजी आणखी एकाचा बळी गेलाय. तरीसुध्दा बिनदिक्कत वाळु उपसा करणार्यांविरुध्द प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. आता याविरुध्द महर्षी वाल्मिकी संघ अध्यक्ष गणेश अंकुशराव आक्रमक झाले असुन जर शासनाने हा अवैध वाळु उपसा थांबवला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.
सध्या सर्वत्र पंढरपूरच्या प्रस्तावित कॉरिडॉरची चर्चा रंगलीय, पंढरपूर प्रशस्त होणार, भाविकांना सर्व सोयी सुविधा मिळणार वगैरे वगैरे चर्चा सुरु असतानाच आम्हाला एक प्रश्न सतावतोय तो म्हणजे शासनाने कॉरिडॉरसाठी जशी धडपड सुरु केलीय पण दरवर्षी चंद्रभागेच्या पात्रात बुडून अनेक वारकरी भाविक जीव गमावताहेत! या प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष का करत आहे?
अवैध वाळु उपशामुळे चंद्रभागेतील पात्रात मोठमोठे खड्डे पडलेत आंघोळीसाठी नदीत उतरलेल्या भाविकांणा या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने येथे बुडून हाकनाक भाविकांचे बळी जाताहेत. 20 तारखेला वाळुच्या खडड्ड्यात बुडून एका वाळु उपसा करणार्या भाविक कामगाराचाच मृत्यू झाला. सदर भाविक कामगाराचा जीव वाचवण्याचा प्रयत्न आम्ही केला पण दुर्दैवाने सदर व्यक्तीचा मृत्यु झाला. हे प्रेत नदीपत्रातुन बाहेर काढण्याचे काम आम्ही आदिवासी कोळी समाज बांधवांनीच केले. वारंवार असे बळी जाणारी बाब अतिशय गंभीर आहे. त्यामूळे महाराष्ट्र सरकारने व विरोधी पक्ष नेत्यांनी सुध्दा हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करुन चंद्रभागेतील वाळु उपशाला कायमस्वरुपी बंदीचा कायदा करुन याचे उल्लंघन करणारांना कडक शिक्षेची तरतुद करावी. अन्यथा आम्ही तीव्र स्वरुपाचे आंदोलन करु, असा इशारा गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिलाय.