करकंब ता.पंढरपूर येथील पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक ४ मार्च २०२३ रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी त्यांनी काळाच्या ओघांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होत असतानाच गुन्हेगारही त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या गुन्ह्यांमध्ये उपयोग करू लागले आहेत.पुर्वीचे पोलीस स्टेशन,त्यांची कार्यपद्धती, त्यावेळची गुन्हेगारी व आजच्या काळामध्ये खूपच बदल झाले आहेत. त्यामुळे पोलीस दलाचेही आधुनिकीकरण होणे गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञानाची माहिती पोलीस दलातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना मिळाली पाहिजे.गुन्हेगारांकडून अत्याधुनिक AK 47 सारख्या शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात येत आहे त्यामुळे पोलीस दलानेही नवीन शस्त्रांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.टप्प्याटप्प्याने सरकारकडून पोलीस दलाच्या आधुनिकीकरणास सुरुवात करण्यात आली आहे.पोलिस दलातील बदल हा समाज हितासाठीच होतो आहे. गुन्हेगारांना कोणतीही जात,धर्म,पंथ नसतो तर गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो.समाजाचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्राधान्याने शासनाची व पोलीस दलाची आहे.पोलिसांना योग्य त्या सुविधा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.राज्याचे पोलीस प्रशासन विपरीत परिस्थितीमध्येही चांगले काम करत आहे.राजकारणासाठी पोलीस दलाचा वापर करण्यात येऊ नये अशा प्रकारचे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तक्रारदाराकडून आलेल्या तक्रारीची नोंद करण्यापूर्वी दोन्ही गटांच्या लोकांबरोबर चर्चा व समुपदेशन करून त्यातून विधायक मार्ग काढण्याचा प्रयत्न संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी करावा,तसेच माझ्या लोकसभा मतदारसंघात सुसज्ज अशा प्रकारची पोलीस कार्यालयाची इमारत झाल्याचे पाहून समाधान वाटते आहे.यावेळी त्यांनी करकंब येथे अप्पर तहसीलदार कार्यालय व्हावे,शिवकालीन तलावाची दुरुस्ती करण्यात यावी,करकंब परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी २ विद्यार्थिनींचा अपघाती मृत्यू झाला त्याबद्दल त्या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी अशा प्रकारची मागणी यावेळी केली.
यावेळी पोलीस अधिकारी,कर्मचारी, आमदार बबनदादा शिंदे,माजी आमदार प्रशांत परिचारक,यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
या उद्घाटनाप्रसंगी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार बबनदादा शिंदे,माजी आमदार प्रशांत परिचारक,वि.पो. महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी,जिल्हाधिकारी सोलापूर मिलिंद शंभरकर,सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव व इतर पोलीस अधिकारी,कर्मचारी तसेच करकंब पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २७ गावांमधील अधिकारी,पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.