पंढरपूर येथील श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन येथे श्री जयचमराजा अर्स एज्युकेशन ट्रस्ट, म्हैसूरचे विश्वस्त श्री डी एन श्रीकांत राज यांचे पर्यावरण विषयक दुर्मिळ प्रजातीय वृक्ष संवर्धनाकरिता विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय शिबिर घेण्यात आले.
||वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे| आळवीती|| येणे सुखरूचे एकांताचा वास| नाही गुणदोष|अंगी येत||
ह्या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाचे संवर्धन, त्याचे महत्व आणि विविध दुर्मिळ सपुष्प वृक्षासंबंधी असणारी माहिती अतिशय उत्तम प्रकारे आणि प्रभावीपणे श्री डी एन श्रीकांत राज अर्स यांनी पीपीटी द्वारे दिली. झाडांच्या विलक्षण आणि दुर्मिळ जाती, वय, फायदे आणि सौंदर्य यासंबंधी विद्यार्थ्यांना समजेल अशा शब्दात माहिती दिली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पर्यावरण मित्र आदरणीय श्री श्रीकांतराज अर्स यांनी पर्यावरण संतुलनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रूजवीत पक्का केला.
जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरण रक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज झाली असून विद्यार्थ्यांनी अध्ययन व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या समस्येवर मार्ग काढणे आवश्यक आहे येणाऱ्या चार-पाच वर्षात आपल्या घराभोवतालचा, शाळेभोवतालचा आणि आपले शहर व परिसर सुंदर दिसण्याकरता हीच वेळ आहे दुर्मिळ सपुष्प वनस्पतींचे वृक्षारोपण करण्याची आणि तसे वृक्ष संवर्धन करण्याची, असे मत प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शीनी सरदेसाई यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमा वेळी पांडुरंग प्रतिष्ठानचे प्रमुख रोहन परिचारक, संस्थेचे रजिस्ट्रार श्री गणेश वाळके, डॉ.अभय उत्पात, श्री प्रवीण तळे आणि श्री मनोज देवकर इत्यादी उपस्थित होते. आपले गाव जसे स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे तसेच ते सुंदर ही असावे, यासाठी प्रत्येक नागरिकाने म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्न केला पाहिजे. रस्ते विकासासोबतच रस्ते सुशोभित करणे हेही तितकीच महत्त्वाचे आहे आणि मैसूरचे रस्ते सुशोभीकरण आणि सौंदर्य तर सर्वज्ञातच आहे, अगदी तसेच ही पांडुरंगाची नगरी पंढरपूर ही सुंदर दिसावे आणि वारीच्या निमित्ताने फुलून येणारे पंढरपूर रंगीबेरंगी दुर्मिळ जातींच्या सपुष्प वनस्पतींच्या वृक्षांच्या रंगबेरंगी फुलांनी बहरून यावे असे प्रतिपादन पांडुरंग प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त श्री रोहनजी परिचारक यांनी केले.