पहिली उचल किती मागणार याकडे सर्वाचे लक्ष
सोलापूर जिल्ह्यातील ऊस दरवाढीसाठीच्या आंदोलनाची घोषणा पंढरपुरातील शिवाजी चौक (शिवतीर्थ) रविवार दि. २३ रोजी होणाऱ्या ऊस परिषदेतून होणार आहे. शेतकरी घामाचा दाम मिळविण्यासाठी याठिकाणहून दंड थोपटणार आहे. राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व शेतकरी संघटनांची ऊस दर संघर्ष समितीची स्थापना केली असून, त्यामाध्यमातून हा लढा उभारला जात असल्याची माहिती येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
उसाचा एकरी उत्पादन खर्च दरवर्षी वाढत असताना ऊसाला मात्र अपेक्षित दर मिळत नाही. तण नाशकाची किमंत महिन्यात ३०० रूपयांनी वाढतात. तसा उसाला दर नाही वाढत. केंद्र सरकारने रिकव्हरी बेस हा १०.२५ टक्के करून एफआरपी जाहीर केली. त्याचा फायदा ऊस उत्पादकांना होत नाही. रिकव्हरी चोरण्याचा प्रकार सुरू झाला आहे. यंदाच्या हंगामातील पहिला हप्ता आणि एकून ऊस दर जाहीर केल्याशिवाय ऊस गाळप हंगाम सुरू करू देणार असल्याचे यावेळी संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले. ऊस परिषदेेत शेतकऱ्यांच्या समवेत समोरासमोर चर्चा होऊन पहिली उचल तसेच पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठ-दहा दिवसापासून जिल्ह्यातील विविध भागात शेतकरी पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन ऊस परिषदेविषयी माहिती देण्यात येत आहे. त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले. यावेळी तानाजी बागल, सचिन पाटील, दीपक भोसले, समाधान फाटे, माऊली हळणवर, रणजीत बागल, माऊली जवळेकर, सचिन आटकळे, छगन पवार, विश्रांती भुसनर, बाळासाहेब जगदाळे आदी उपस्थित होतेे.
वर्गणी काढून खर्च
ऊस परिषदेसाठी प्रमुख पदाधिकारी तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून वर्गणी काढून खर्च केला जात आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकी दहा हजार रूपये वर्गणी दिली आहे. शेतकऱ्यांकडूनही वर्गणी येत आहेे. संघर्ष समितीमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून झाला, परंतु त्यात यश आले नाही. ऊस दरासाठीचा संघर्ष कायम राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.