अण्णाभाऊसाठे महामंडळ घोटाळा प्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांना तब्बल आठ वर्षांनी जामीन मंजूर झाला आहे.
1 लाख रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर रमेश कदम यांना हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. परंतु, जामीन मंजूर झाला असला तरी अन्य प्रकरणांमध्येही अटक असल्यामुळे रमेश कदम यांची तूर्तास जेलमधून सुटका होणार नाही. रमेश कदम यांनी तपासात सहकार्य करावं, शिवाय मुंबई-ठाणे हद्द न सोडण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ घोटाळ्यात रमेश कदम हे मुख्य आरोपी आहेत. महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना बोगस लाभार्थी दाखवून रमेश कदमांनी शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी रमेश कदम यांना आठ वर्षापूर्वी अटक केली होती. याच घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. डिसेंबर 2018 मध्ये कारागृहातील असभ्य वर्तन आणि संबंधित खटल्यातील साक्षीदारांचं संरक्षण या मुद्यांवर मुंबई उच्च न्यायालयानं आमदार रमेश कदम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. दरम्यानच्या काळात या ना त्या कारणानं रमेश कदम सतत चर्चेत राहिलेत. मागे एका व्हिडीओ क्लीपमध्ये कदम आर्थर रोड जेलमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचं दिसलं होतं. त्यासंदर्भात रमेश कदम यांच्याविरोधात नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. मात्र, ‘पोलिसांनीच मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि 25 हजारांची लाच मागितली’ असा त्यांचा दावा होता. तसेच भायखळा जेलमध्ये असताना वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातही प्रकरणातही रमेश कदम यांनी पोलिसांवर आरोप केले होते. परंतु, मागील वर्षी मार्च महिन्यात रमेश कदम शिवीगाळ प्रकरणातून दोषमुक्त झाले. रमेश कदम यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले आहे.