पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘सोबस इनसाइट फोरम’ आणि ‘स्वेरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय मार्गदर्शन कार्यकम संपन्न झाला. यामध्ये उद्योजकता व विकास यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
स्वेरी ही शैक्षणिक उपक्रमाबरोबरच विविध बौद्धिक उपक्रमांसाठी देखील नेहमी प्रोत्साहन देत असते. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयचे प्रा. डॉ बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचा ‘सोबस इनसाइट फोरम’ सोबत सामंजस्य करार स्थापन करण्यात आला आहे. या कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपयुक्त तंत्रज्ञानाची ओळख होणार आहे. आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादात स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी ‘उद्योजकता, नाविन्य आणि प्रेरणा’ या विषयावर माहिती मिळविली. स्वेरी अभियांत्रिकीच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांसोबत सोबस मधील मार्गदर्शक आणि बोर्ड सदस्यांनी संवाद साधला. यामध्ये त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा विद्यार्थ्यांना फायदा झाला. यावेळी सोबसच्या संचालिका अर्चना गेहलोत म्हणाल्या की,‘विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेच्या विश्वात रमावे. पंढरपूरमध्ये उद्योग सुरु करण्यास हरकत नाही. कल्पकता, आणि वेळ मिळाल्यास कोणताही उद्योग यशस्वी होतो. या शहराला आपण उद्योजकतेचे तीर्थक्षेत्र बनवू शकतो. पंढरपूर हे स्वतःच्या परिश्रमाने उभे राहणारे व उद्योगासाठी उत्तम शहर आहे. याठिकाणी महिला उद्योजकता आणि युवा नेतृत्वाचे एक उत्तम केंद्र निश्चित निर्माण होईल.’ सोबसचे तंत्रज्ञान सल्लागार मनीष गेहलोत म्हणाले की, ‘समाजातील समस्यांसाठी तंत्रज्ञान-समर्पित उपाय तयार करणे गरजेचे आहे. उद्योजकता नेहमीच विचारांच्या पलीकडील साधन असून यामुळे आपली स्वप्ने पूर्ण होतात. समाजाला भेडसावणारी समस्या सोडवण्यासाठी पैसा व वेळ आवश्यक असते. उद्योग धंद्याच्या माध्यमातून आपण अर्थप्राप्ती करू शकतो. समस्या या लहान व मोठया असतात, यावर उपाय शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. तरुणांना उद्योग धंद्यासाठी मोठमोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. तथापी, उद्योजकतेची भावना तुम्हाला त्या समस्यांचे निराकरण करण्यात मदत करेल. या ऑनलाइन कार्यक्रमात सोबसचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक दिग्विजय चौधरी म्हणाले की, ‘उद्योजकतेबद्दल विद्यार्थ्यांनी विचार करून संकल्पना आमलात आणण्याची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थी हा भविष्यात उद्योजक होईलच असे ठाम सांगता येत नाही पण तरुणाईमध्ये उद्योजकतेची पाया भरणी करून आपण जीवन कौशल्य निश्चितपणे निर्माण करू शकतो. तरुणांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी योग्य पर्यावरणास पूरक वातावरण देखील तयार करू शकतो. आम्हाला पंढरपूरसाठी असे काहीतरी करायचे आहे की, ज्यामुळे पंढरपूरमध्ये युवा पिढी आणखी उद्योजकतेकडे वळेल. तुमच्याकडे उद्योजकीय कौशल्ये, गुणवत्ता असल्यास प्रत्येक गोष्टीत यश मिळेल.’ व्हील्स ग्लोबल फाउंडेशन इंडियाचे संचालक इंद्रजित चटर्जी यांनी ऑनलाइन मार्गदर्शन करताना स्मार्ट व्हिलेज प्रोजेक्ट सारख्या संकल्पनेची ओळख करून दिली. सोबसचे संचालक अरविंद पाच्छापूरे म्हणाले की, ‘कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी उद्योजकता सुरू करण्याची गरज आहे. जेंव्हा तुम्ही सुरुवात करता तेंव्हा तुम्ही जोखीम टाळता. पण पुढे जबाबदारी जेंव्हा घ्याल त्यावेळी मात्र यशस्वी होता हे सूत्र आहे. व्यवसाय वाढीची रणनिती आणि अंमलबजावणीसाठी उद्योजकाला व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायऱ्यांची रूपरेषा जाणून घेणे गरजेचे आहे. शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांवर काम करण्यासाठी व उद्योजक बनण्यासाठी स्वेरी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. सोबसचे कार्यक्रम व्यवस्थापक गिरीश संपत यांनी स्वेरीमध्ये स्टार्ट-अप क्लब सुरू करण्याची घोषणा केली, जी विद्यार्थ्यांना विविध उपक्रम आणि उपक्रमांची ओळख करून देईल. स्वेरीने सोबस सोबत सामंजस्य करार केला असून ‘सोबस सेंटर ऑफ एक्सलन्स’ च्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी आणि पंढरपूरमध्ये आर्थिक प्रगती करण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसोबत अनेक ऑनलाइन सत्रे आयोजित केली आहेत. माजी विद्यार्थ्यांसोबत वैयक्तिक बैठका घेतल्या आहेत आणि सामाजिक उद्योजकतेसाठी डिझाइन थिंकिंगवर ऑनलाइन अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) देखील आयोजित केला आहे. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सोबसचे आकांक्षा सिन्हा, ईशान पंत, डॉली पारेख, अश्विन गांधी, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत गिड्डे, डॉ. प्रवीण ढवळे यांनी परिश्रम घेतले. प्रा. उर्मिला गुळघाने यांनी सूत्रसंचालन केले तर सोबसचे कार्यक्रम व्यवस्थापक गिरीश संपत यांनी आभार मानले.