सोलापूर महापालिकेत एक वार्ड पद्धतीने आगामी निवडणूक? निवडणूक आयोगाची तयारी
महाराष्ट्रात आगामी काळात येणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहत आहेत. यासाठी आत्तापासूनच राज्यातल्या प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली असून, यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यात महाविकास आघाडी असतानाही सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे, तर शिवसेना-भाजपच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. यातच, आता महापालिकांची निवडणूक एक सदस्य प्रभाग पद्धतीनं होणार असल्याची तयारी सुरु आहे मात्र सोलापूरात दोन सदस्यांचा एक प्रभाग करण्याची मागणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आहे.
निवडणूक आयोगाने आगामी काळात येणाऱ्या या निवडणुकांच्या दृष्टीने आता तयारी सुरु केली असून, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक सोलापूरसह १० मनपांची निवडणूक पुढच्या वर्षी फेब्रुवारीतच होणार आहे, तर कोरोना महामारीमुळे मागील वर्षीपासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, वसई-विरार या आधीच मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणूका यावर्षी ऑकटोबरमध्ये होऊ शकतात, याप्रकारचे नियोजन निवडणूक आयोगाकडून केलॆ जात आहे.
त्यामुळे आता, या महापलिकांच्या प्रभागरचनेच्या कामाला येत्या १ जुलैपासून सुरुवात होणार असून, आराखडा तयार करण्याची मुदत १५ ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. यांनतर १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंतच्या १ महिन्याच्या कालावधीत, प्रभागरचनेबाबत कुणाला आक्षेप असेल किंवा हरकत असेल, ती नोंदवण्याचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान, महापालिकांची निवडणूक एक सदस्य प्रभाग पद्धतीने करण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयामुळे, भाजपला याचा फटका बसणार असल्याचा चर्चा आहेत.
याआधी फडणवीस सरकारच्या काळात, चार सदस्यांचा एक प्रभाग असा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा सोलापूरात भाजपच्या लाटेत तब्बल 49 नगरसेवक निवडून आले होते, तर शिवसेनेला 21 जागा मिळाल्या होत्या, काँग्रेस राष्ट्रवादीची मात्र दाणादाण झाली, एमआयएम ने 9 जागा जिंकल्या, मात्र, आता सत्तापालट झाल्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना हा निर्णय आपल्या हिताचा वाटत नसल्याने, त्यांनी प्रभागरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला जात आहे.