सोलापूर जिल्ह्यात अवकाळीचा द्राक्ष बागांना फटका, शेतकरी हवालदिल (माल घेण्यास व्यापाऱ्यांचा नकार)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला आहे. पंढरपूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला आहे. या पवासामुळे द्राक्षांचे घड खाली पडले आहेत. तसेच काही ठिकाणी द्राक्षाच्या मण्याला तडे गेले आहेत. 

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, खर्डी, करकंबसह अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे द्राक्षांचे घड खाली पडत आहेत. तसेच मण्यांना तडेही जात आहेत. यामुळे व्यापारी माल घेण्यास नकार देऊ लागल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. पंढरपूर तालुक्यात कासेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर द्राक्षाच्या बागा आहेत. मात्र, गेली दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना या बागा कशा वाचवायच्या असा प्रश्न पडला आहे. पावसाच्या पाण्यामुळे द्राक्ष खराब होऊ लागल्याने मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी:-शेतक-यांची मागणी

दरम्यान, नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तात्काळ पंचनामे करुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणीही शेतकरी करत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार अजून चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असाच पाऊस राहिल्यास संपूर्ण बागा उद्ध्वस्त होतील अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरु आहेत. अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. यामुळे मानवी आरोग्यासही परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात २० मार्चपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे शेती पिकांना फटका बसत आहे. 

सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा तिसऱ्या आठवड्यातील आज शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशीही विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आजही आंदोलन सुरु केलं आहे. ‘खोके सरकारचा उपयोग काय शेतकऱ्यांना न्याय नाय’ अशा घोषणा विरोधक देत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here