राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्तांना १६ हजार किट्सचं होणार वाटप
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची माहिती
महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे शेतकरी, व्यापारी, कष्टकरी आणि उद्योजकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, यातील सहा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे. एकूण १६ हजार कुटुंबांच मोठं नुकसान झालं असून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्तांना १६ हजार किट्सचं वाटप केलं जाणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केली. राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्तांना मास्क तसेच पुरामुळे आजारी पडलेल्यांवर औषधोपचार करण्यात येतील त्यासाठी २५० डॉक्टरांचे पथकही या ठिकाणी पाठवण्यात येणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. राज्यात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मदतकार्य होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखलं पाहिजे. दौरे केल्याने यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते. ते योग्य नाही. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे. या पुरामुळ कोकणात घरांचं नुकसान झालंय. इतर ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय. माती वाहून गेलंय. राज्य सरकार त्यांच्या कार्यक्रमानुसार मदत करेल. काही तातडीची मदत राज्य सरकारकडून मिळणार आहे. आढाव्यानंतर राज्य सरकार आणखी मदत जाहीर करेल अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दिली.