राज्यात लवकरच होणार जिल्हा बँकांच्या निवडणुका
पाच वर्षांची मुदत संपलेल्या, मात्र कोरोना साथीमुळे निवडणुका रखडलेल्या राज्यातील १३ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्याबाबत मतदार याद्या बनवण्याचे आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने सोमवारी जारी केले.
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीस विलंब नको म्हणून मुदत संपूनही तीन महिने जिल्हा बँकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर लगेच कोविडची साथ आली. निवडणूका मुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी मार्च २०२० आणि त्यानंतर एप्रिल २०२१ अशी दोन वेळा संसर्गाच्या कारणांमुळे त्या ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सध्या राज्यात कोरोनाची रुग्णवाढ मंदावली आहे. त्यामुळे पाच वर्षांची मुदत संपलेली आहे, आणि संचालकांची मुदत संपून १५ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे, अशा बँकांच्या मतदार याद्या तयार करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.याद्या बनवणे, आक्षेप नोंदवून घेणे आणि सुनावणी घेणे, अंतिम मतदार याद्या बनवणे या प्रक्रियेला किमान २५ दिवसांचा अवधी लागतो. बँकांची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर रद्द करण्यात आली होती, तेथून ती पुढे राबवली जाणार आहे. राज्यात ३१ जिल्हा बँका असून पैकी १३ बँकांची निवडणुका लवकरच होईल. त्यामध्ये औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, उस्मानाबाद या जिल्हा बँकांचा समावेश आहे.