राज्यातील कोणताही मंत्री शेकडो कोटींशिवाय बोलत नाही, तरीही शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  वाडीकुरोली येथे वसंतदादांच्या जयंतीनिमित्त शेतकरी मेळावा संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राज्यातील कोणताही मंत्री शेकडो कोटींशिवाय बोलत नाही, तरीही शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

वाडीकुरोली येथे वसंतदादांच्या जयंतीनिमित्त शेतकरी मेळावा संपन्न

राज्यात कोणताही मंत्री कोटीत बोलतच नाही तर शेकडो कोटिच्या घोषणा करीत आहेत. अशा घोषणा केल्या की लोक प्रभावित होतात, परत कोण विचारत नाही, या भूमिकेतून काम करणारे सरकार राज्यात आहे. या सरकारने अर्थ संकल्प मांडल्यानंतर पुन्हा पंचाहत्तर हजार कोटी रुपयांचा पुरवणी अर्थसंकल्प मांडला आहे. तरीही शेतकऱ्यांना काही मिळाले नाही, सरकारच्या तिजोरीत नसल्याने लोकांना दिलेली आश्वासने पाळली जात नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारवर केली. वाडीकुरोली ( ता. पंढरपूर ) येथे सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या जयंती निमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ. बबनदादा शिंदे, आ. यशवंत माने, माजी आ. दीपक साळुंखे-पाटील, राष्ट्रवादी उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, युवराज पाटील, भगीरथ भालके, ऍड. गणेश पाटील, युवा नेते समाधान काळे आदी प्रमुख उपस्थित होते.

तत्पूर्वी श्रीराम शिक्षण संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्रीराम शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण भागातील मुलींसाठी सुरु केलेल्या सायकल बँकेचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते मुलींना सायकल वाटप करून झाला. यावेळी खो खो स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील जानकी पुरस्कार मिळवलेल्या प्रीती अशोक काळे या खो – खो खेळाडूचा सत्कार आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले कि, देशात महागाई वाढते आहे, पेट्रोल शंभर रुपयेच्या पुढे गेले . दळणवणाची साधने महागली, प्रवास महागला मात्र उत्पन्न वाढले नाही. देशपातळीवर वार्षिक सर्व्हेक्षण झाले आहे, त्यानुसार भारतातील लोकांचे आणि शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न दरवर्षी घटते आहे. सध्या अनेक ज्वलंत प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिले आहेत . केंद्रात मनमोहनसिग सरकार आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार असताना दरवर्षी शेतमालाच्या किमती वाढत होत्या, त्याकाळातच ग्रामीण भागात ट्रॅक्टर आणि कारची सर्वाधिक विक्री झाली. मनमोहनसिंग सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या हातात पैसे यावेत असे होते. त्या दहा वर्षात विविध योजनांतून ग्रामीण भागात जास्त पैसे आले, मात्र सद्याच्या सरकारचे धोरण आपल्यां हिताचे नाही, अशीही टीका पाटील यांनी केली. सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या कार्याला उजाळा देताना आ. पाटील म्हणाले कि, स्व .वसंत दादांनी सरपंच, मार्केट कमिटी, पंचायत समिती, विठ्ठल सहकारी, चंद्रभागा सहकरीच्या माध्यमातुन लोकांच्या विकासासाठी प्रयत्न केले. शिक्षणाची व्यवस्था संस्थेच्या माध्यमातून केली. आता नवीन इंग्लिश मिडीयम उभा राहिले आहे. आता कल्याणराव काळे सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत. स्व.वसंत दादांच्या पावलावर पाऊल टाकून काम करीत आहेत.यावेळी आ. बबनदादा शिंदे म्हणाले कि, कल्याणराव काळे हे या भागात नवीन काही उपक्रम राबवत असतात. यावर्षी त्यांनी सीबीएसई स्कूलचा शुभारंभ केला. देखणी इमारत उभा केली. यामुळे शेतकरी वर्गातील मुलाची यामुळे सोय होणार आहे. जिल्ह्यात वीज तोडणी सुरू झालेली आहे, या संदर्भात जयंत पाटील यांनी अधिवेशनात विषय मांडून मार्ग काढावा, पीक कर्ज वेळेवर भरणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज माफी झालेली नाही. ती मिळविण्यासाठी पाटील यांनी लक्ष घालावे,अशी मागणी पाटील यांच्याकडे केली.

प्रास्ताविक करताना कल्याणराव काळे यांनी, सहकार शिरोमणी वसंत दादांचे विचार तळागाळात पोहोचवावेत म्हणून दरवर्षी विविध कार्यक्रम घेतो. या भागातील युवकांना रोजगार, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी श्रीराम शिक्षण संकुल प्रयत्नशील आहे. नवीन इंग्लिश मिडीयम सुरू केले. सायकल बँकिंग योजना सुरू केली. तीस सायकली मुलींना वाटप करण्यात आल्याचे सांगितले.

 

यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख, प्रतिभादेवी पतसंस्थेचे माज.चेअरमन महादेव देठे, कारखान्यचे उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे, संचालक, मारुती भोसले, गोरख जाधव, युवराज दगडे, विलास जगदाळे, बाळासाहेब कौलगे, मोहन नागटिळक, बिभिषण पवार, दिनकर कदम, दिनकर चव्हाण, योगेश ताड, तानाजी सरदार,राजाराम पाटील, आण्णा मामा शिंदे, प्रदीप निर्मळ, मालनबाई काळे, अरुण बागल, इब्राहिम मुजावर भारत कोळेकर,सुधाकर कवडे, प्रा. मारुती जाधव, स्वप्नील जगताप, रणजीत पाटील, यशवंत पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमार, चंद्रकांत पाटील, विलासराव काळे, राजाभाऊ माने, हणमंत सुरवसे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णाताई शिवपुजे, तालुकाध्यक्ष राजश्री ताड, सौ. वर्षा शिंदे, सौ. अनिता पवार, सुनंदा उमाटे, यांचेसह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, शेतकरी बांधव मोठया संख्येनी उपस्थित होते.

आभार प्रदर्शन श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here