माहितीचे विश्लेषण
भारतातील काही यूट्यूब वाहिन्यांद्वारे प्रसारित झालेल्या माहितीतून विविध धार्मिक समुदायांच्या सदस्यांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. बंदी घालण्यात आलेल्या यू ट्यूब वाहिन्यांवरील विविध व्हिडीओमध्ये चुकीचे दावे करण्यात आले होते. उदाहरण घ्यायचे तर, भारत सरकारने काही धार्मिक वास्तू पाडून टाकण्याचे आदेश दिले आहेत; भारत सरकारने काही धार्मिक सण साजरे करण्यावर बंदी घातली आहे किंवा देशात धार्मिक युद्ध जाहीर केले आहे इत्यादी चुकीच्या बातम्या सांगता येतील. अशा मजकूरामुळे देशात सामाजिक तेढ निर्माण होण्याची आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे आढळून आले आहे.
भारतीय सशस्त्र दले, जम्मू-कश्मीर आदींबाबत खोट्या बातम्या प्रसारित करण्यासाठी देखील या यू ट्यूब वाहिन्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. या बातम्यांचा मजकूर संपूर्णतः चुकीचा तसेच देशाची राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताचे परराष्ट्रांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध यांच्या दृष्टीकोनातून संवेदनशील असल्याचे आढळून आले आहे.
केंद्रीय मंत्रालयाने बंदी घातलेल्या वाहिन्या भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, देशाची सुरक्षितता, भारताचे परराष्ट्रांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि देशातील सार्वजनिक सुव्यवस्था यांच्या दृष्टीने हानिकारक मजकूर प्रसारित करत असल्याचे आढळले आहे. परिणामी, हा प्रकार माहिती तंत्रज्ञान कायदा,2000 मधील कलम 69 अ च्या कक्षेत येत असल्यामुळे या यू ट्यूब वाहिन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
गुन्ह्याची पद्धती
यू ट्यूब वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे, ती विशिष्ट दूरचित्रवाणी वाहिनीवरून दिल्या जाणार्या बातम्या अधिकृत आणि खर्या आहेत, असे भासवून प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी वृत्तनिवेदकांची बनावट छायाचित्रे आणि संवेदनशील लघुप्रतिमा (थंबनेल्स) तसेच वाहिन्यांचे लोगो वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
मंत्रालयाने बंदी घातलेले सर्व यू ट्यूब चॅनल्स सामाजिक सलोखा, सार्वजनिक सुव्यवस्था आणि भारताच्या परराष्ट्र संबंधांना घातक ठरतील असा चुकीचा आशय असलेल्या जाहिराती त्यांच्या चित्रफितींमधून दाखवत होते. यासह, डिसेंबर 2021 पासून, मंत्रालयाने आतापर्यंत 102 यू ट्यूब आधारित वृत्त वाहिन्या आणि इतर अनेक समाजमाध्यमांवरील अकांऊंट्स ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. भारत सरकार अधिकृत, विश्वासार्ह आणि सुरक्षित ऑनलाईन वृत्त सेवा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांना धोका पोहचवण्याचे कोणत्याही प्रकारचे प्रयत्न उधळून लावले जातील.