पंढरपूर शहरातील धुळीच्या प्रश्नाबाबत युवा सेना आक्रमक झाली असुन आज युवा सेनेच्या वतीने प्रत्यक्ष विठ्ठलाकडेच मास्क बांधुन साकडं घालण्यात आलं.
पंढरपूर नगरपरिषदेची सर्व सुत्रे सध्या प्रशासकीय अधिकार्यांकडं आहेत. त्यामुळं माजी नगरसेवक, नगराध्यक्ष यांना कोणत्याही प्रश्नाबाबत जाब विचारण्याचा अधिकार सामान्य नागरिकांना राहिलेला नाही. सध्या पंढरीत सर्वत्र प्रचंड धुळीचं साम्राज्य आहे, शहरातील स्वच्छता नियमित होत नाही, शहर स्वच्छ करण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन नगरपरिषदेने घेतलेलं धुळ काढण्याचं मशीनही बंद अवस्थेत आहे. परंतु याकडं नगरपरिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेचं कसलंच लक्ष नाही. याचा त्रास मात्र सर्वसामान्य करदात्या पंढरपूरकरांना सहन करावा लागतोय. त्यामुळं आम्ही वारंवार याबाबत वेगवेगळी आंदोलनं केली परंतु नगरपरिषद प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे आज आम्ही प्रत्यक्ष विठ्ठलाकडंच तोंडावर मास्क बांधुन साकडं घातलं की, ‘‘बा विठ्ठला आत्ता तुच या झोपलेल्या प्रशासनाला जागं कर.’’ अशी माहिती शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे पंढरपूर शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर यांनी दिली.
यावेळी युवासेना शहर समन्वयक स्वप्नील गावडे, उपशहर अधिकारी अतिश काळे, अक्षय ढाळे, विशाल डोंगरे, महेश हिंगमिरे, महेश कारंडे, सुरज कांबळे, गणेश बारसकर, अमर उपळकर, गणेश साळुंखे आदी युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट:- पंढरपूर शहरातील प्रचंड धुळीमुळे वयोवृध्द नागरिक व लहान मुलांना श्वसनाचे विकार जडत आहेत. विविध हॉस्पिटल्समध्ये अशी रुग्ण आढळुन येत आहेत. धुळीमुळेच हे आजार बळावत असल्याची माहिती स्थानिक डॉक्टर्स देत आहेत. त्यामुळं आत्ता तरी नगरपरिषद प्रशासनानं या प्रश्नाकडं लक्ष देऊन शहरातील विविध भागात नियमित स्वच्छता करावी. असे मत श्रीनिवास उपळकर यांनी व्यक्त केले.