आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अलकाताई राठोड तर राज्याचे खो-खो संघटनेचे उपाध्यक्ष महेश गादेकर तर सर्वोच्च अर्जुन पुरस्काराच्या मानकरी सारीका काळे, किरण स्पोर्टस् क्लबचे पदाधिकारी, खेळासाठी जमलेल्या खेळाडू बंधू-भगीनींनो मी आपल्याला विनंती करतो की, भाजी मार्केटमधून पेरू, आंबा, चिक्कू आणता येतो, गाजर, आंबा घेता येतो. मेथीची पेंडी आणता येते परंतु एक किलो आरोग्य विकत द्या म्हटले तर बाजारात कुठेच मिळत नाही. स्वतःच कष्टाने स्वतःसाठी मिळवावे लागते. त्याची बाजारपेठ मात्र खेळाच्या मैदानात उपलब्ध असते. रयतेच्या वटवृक्षाला मोह नभाचा पडावा अशीच जादु खेळातून वाकुल्या दाखवित असते. अत्यंत कष्टाळू जाधव सारखा कोचर खो-खो साठी बोलावित असतात. यातूनच सारीका काळे, भाग्यश्री बिले, कसगावडे, श्रीकांत ढेपे या व्यक्तीमत्वं खेळातून घडत असतात.
समाजात, पतसंस्थेत, एस.टीत, समारंभात खेळाडू वावरताना त्याचे बोलणे, चालणे, वागणे एकुणच एका आकर्षक व्यक्तीमत्वाची झालर असते. खेळाडू मित्रांनो वेळ काढून जय भिम सारखा, मनकर्णीका सारखा सिनेमा विद्यार्थ्यांनी बघायलाच हवा. तर कुरूप सारख्या सिनेमाचे चिंतन व्हायलाच हवे. यामधूनच माणसाचे व्यक्तीमत्व घडत असते. अर्जुनासारखा राज्यकर्त्यांचा आणि धनिकाचा पोरगा वर्गात बसला असताना त्याने हे लक्षात ठेवायलाच हवे की स्पर्धेसाठी भिल्ल समाजाचा पोरगा वाट पाहतोय. वसुंधरा महाविद्यालयाच्या मैदानावर रजपूत सर, काळे सर, पांढरे सरांनी घडविलेले विद्यार्थी खेळाच्या क्षितीजावर चमकताना दिसतात. खेळातल्या कष्टानेच खेळातल्या क्षितीजावर तळपताना दिसतात. आज समाजाला पोखरणारी व्यसनं जर दुर सारायची असतील तर खेळाच्या जादूनेच सात्वीकता घडू शकते. राष्ट्राचे संस्कार घडू शकतात. यामुळेच किरण स्पोर्टने शहरातल्या, खेड्यातल्या तरूण पिढीला गेले 18 वर्षे सतत मार्गदर्शन केले आहे. कारण बुद्धीची एकाग्रता वाढविण्याचे सामर्थ्य खेळात असून तारूण्याचे ताजेपण राखण्याचे कौशल्य देखील खेळामधूनच साध्य होते. चिरतारूण्याची दिक्षा मिळते. हे सारे वैभव खेळामधूनच घडते. एवढेच नव्हे तर जीवनात यश-अपयश पचविण्याचे सामर्थ्य देखील खेळातूनच प्राप्त होते. अशी प्ररखड प्रतिक्रिया प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी वसुंधरा मैदान, सोलापूर येथे व्यक्त केली.